अ‍ॅपशहर

दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; फोटो शूट करत असताना...

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे नगरपरिषदेच्या साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited byगणेश कदम | Lipi 7 Mar 2022, 11:20 am
दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दौंड-कुरकुंभ मार्गावरील मोरे वस्तीजवळील साठवण तलाव परिसरात ही घटना घडली. रविवारी रात्री उशीरा या तिघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Daund
दौंडमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू


आसरार अलीम काझी (वय २१), करीम अब्दुल हादी फरीद काझी (वय २०), अतिक उझजमा फरीद शेख (वय २०) अशी या घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील आसरार आणि करीम हे दोघे चुलत भाऊ असून अतिक हा त्यांचा मित्र आहे.

वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या कारवर चप्पलफेक, रोहित पवार म्हणाले…

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हे तीनही विद्यार्थी दौंड शहरातील नवगिरेवस्ती येथील रहिवासी आहेत. हे तिघे रविवारी दि. ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या दरम्यान दुचाकी घेऊन फिरावयास घराबाहेर पडले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाइल बंद होता. त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राला मोबाइलवर संपर्क साधला असता त्याच्या मोबाईलची फक्त रिंग वाजत होती. मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिघांच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

या दरम्यान, तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कुटुंबीयांनी या परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला. त्यावेळी तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग आढळून आली. हे तिघेही पाण्यात बुडाल्याची शंका आल्याने त्यांनी दौंड पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत तलावातील पाण्यात मुलांचा शोध घेतला. साधारणतः रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

वाचा: पुण्यात मोदींच्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी दिला भाजपला धक्का!

हे तिघेही तलाव परिसरात फोटो शूटसाठी गेले होते. त्यापैकी एक पाण्यात उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला. दोघांनाही पाण्याबाहेर पडता येत नाही व ते बुडत आहेत असे दिसल्याने तिसरा मित्रही त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. त्याचवेळी तिघेही पाण्यात बुडाले असावेत अशी प्राथमिक माहिती आहे.

मृतांपैकी असरार हा बीए परीक्षा उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत होता. तर त्याचा चुलत भाऊ करीम व त्याचा मित्र अतिक हे दोघेही पुना कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होते, अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली. तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज