म. टा. प्रतिनिधी, पुणे
बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल ३५ लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असतानाच, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसी) ‘ट्रान्सपोर्ट हब’चे कारण पुढे करून टाकीचे कामच बंद पाडले आहे. बालेवाडी परिसरात पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने या भागांतील बांधकामांवर निर्बंध घातले गेले असताना, हे काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी त्यातच खो घालून ‘स्मार्ट’ कारभाराची प्रचितीच दिली गेली आहे.
शहरात समान पाणीपुरवठ्यांतर्गत ८२ नव्या टाक्या उभारण्यात येत आहेत. या टाक्यांपैकी बालेवाडी आणि परिसराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तब्बल ३५ लाख लिटरची टाकी जकात नाक्याजवळील पालिकेच्या जागेत उभारण्याचे काम सुरू झाले होते. टाकीसाठी पाया खणून जमिनीच्या वरपर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अचानाक स्मार्ट सिटी कंपनीने ही जागा ‘ट्रान्सपोर्ट हब’साठी निश्चित केल्याने हे काम थांबविण्यात यावे, असा आग्रह धरला. पाणीपुरवठा विभागाने टाकी महत्त्वाची असल्याने काम थांबविण्यास नकार दिला. त्या वेळी, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुणाल कुमार यांनी आपल्या अधिकारात हे काम थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर, काही काळ प्रेरणा देशभ्रतार आणि त्यानंतर राजेंद्र जगताप यांच्याकडे सीईओचा कारभार असला, तरी टाक्यांच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही.
पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये बालेवाडी येथे ट्रान्सपोर्ट हब विकसित केले जाणार आहे. त्यासाठी, स्मार्ट सिटी कंपनीला जकात नाक्याची जागा लागणार असून, टाक्यांचे काम सुरू झाल्यानंतर या जागेवर कंपनीने दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या वेळी हायकोर्टाने नवीन बांधकामांवर निर्बंध घातले होते. त्यामुळे, या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून टाकीचे बांधकाम केले जात असताना, स्मार्ट सिटी कंपनीने त्यावर हक्क प्रस्थापित केला आहे. पाण्याच्या टाकीचे हे काम थांबले, तर बालेवाडीचा पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून टाकीचे बांधकाम ठप्प झाले असून, त्याचे काम अर्धवट झाल्याने त्यावर केलेला खर्चही वाया जाण्याची भीती अधिकाऱ्यांनी वर्तवली. याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पालिकेच्या जागा स्मार्ट सिटीच्या घशात?
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) मंडईसाठी बांधण्यात आलेली जागा स्मार्ट सिटी कंपनीने कंट्रोल रूमसाठी ताब्यात घेतल्यानंतर आता पालिकेची बालेवाडीची जागाही ट्रान्सपोर्ट हबच्या नावाखाली घेण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रकल्प सुरू केले जाणार असल्याच्या घोषणा झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात एकही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही.
बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल ३५ लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असतानाच, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसी) ‘ट्रान्सपोर्ट हब’चे कारण पुढे करून टाकीचे कामच बंद पाडले आहे. बालेवाडी परिसरात पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने या भागांतील बांधकामांवर निर्बंध घातले गेले असताना, हे काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी त्यातच खो घालून ‘स्मार्ट’ कारभाराची प्रचितीच दिली गेली आहे.
शहरात समान पाणीपुरवठ्यांतर्गत ८२ नव्या टाक्या उभारण्यात येत आहेत. या टाक्यांपैकी बालेवाडी आणि परिसराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तब्बल ३५ लाख लिटरची टाकी जकात नाक्याजवळील पालिकेच्या जागेत उभारण्याचे काम सुरू झाले होते. टाकीसाठी पाया खणून जमिनीच्या वरपर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अचानाक स्मार्ट सिटी कंपनीने ही जागा ‘ट्रान्सपोर्ट हब’साठी निश्चित केल्याने हे काम थांबविण्यात यावे, असा आग्रह धरला. पाणीपुरवठा विभागाने टाकी महत्त्वाची असल्याने काम थांबविण्यास नकार दिला. त्या वेळी, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुणाल कुमार यांनी आपल्या अधिकारात हे काम थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर, काही काळ प्रेरणा देशभ्रतार आणि त्यानंतर राजेंद्र जगताप यांच्याकडे सीईओचा कारभार असला, तरी टाक्यांच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही.
पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये बालेवाडी येथे ट्रान्सपोर्ट हब विकसित केले जाणार आहे. त्यासाठी, स्मार्ट सिटी कंपनीला जकात नाक्याची जागा लागणार असून, टाक्यांचे काम सुरू झाल्यानंतर या जागेवर कंपनीने दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या वेळी हायकोर्टाने नवीन बांधकामांवर निर्बंध घातले होते. त्यामुळे, या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून टाकीचे बांधकाम केले जात असताना, स्मार्ट सिटी कंपनीने त्यावर हक्क प्रस्थापित केला आहे. पाण्याच्या टाकीचे हे काम थांबले, तर बालेवाडीचा पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून टाकीचे बांधकाम ठप्प झाले असून, त्याचे काम अर्धवट झाल्याने त्यावर केलेला खर्चही वाया जाण्याची भीती अधिकाऱ्यांनी वर्तवली. याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पालिकेच्या जागा स्मार्ट सिटीच्या घशात?
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) मंडईसाठी बांधण्यात आलेली जागा स्मार्ट सिटी कंपनीने कंट्रोल रूमसाठी ताब्यात घेतल्यानंतर आता पालिकेची बालेवाडीची जागाही ट्रान्सपोर्ट हबच्या नावाखाली घेण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रकल्प सुरू केले जाणार असल्याच्या घोषणा झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात एकही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही.