म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहशतवादी कारवाया, दगडफेक, निदर्शने, कर्फ्यू, सैन्यदल... म्हणजे जम्मू-काश्मीर, असे चित्र अनेकदा रंगवले जाते. पण इथल्या माणसांमध्ये प्रचंड आपुलकी आणि माणुसकी आहे, याचे एक उदाहरण समोर आले आहे. जम्मूमधील डोडा जिल्ह्यात अडकलेल्या तीन पुणेकर फिल्ममेकर्सना गेल्या एक महिन्यापासून एक कुटुंब सांभाळत आहे. लॉकडाउनमुळे तिथे अडकलेल्या या कलाकारांना केवळ त्या कुटुंबाचेच नाही; तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांचेही आदरातिथ्य लाभत आहे.
नचिकेत गुत्तीकर, शमीन कुलकर्णी आणि निनाद दातार हे तीन कलावंत एका डॉक्युमेंटरीच्या चित्रीकरणासाठी १५ मार्चला जम्मू- काश्मीरला गेले होते. २५ मार्चच्या विमानाने ते पुण्यात परतणार होते. पण देशात २४ मार्चपासून लॉकडाउन झाले आणि नचिकेतसह त्याचे दोन्ही मित्र जम्मूमध्ये अडकले. नाझीम मलिक आणि नचिकेत हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. लॉकडाउनचे कळताच मलिक यांच्या कुटुंबीयांनी तिन्ही कलाकारांना जणू आपल्या कुटुंबात सामावून घेतले. आता जवळजवळ एक महिन्याहून अधिक काळ झाला, तरी नचिकेत व त्याचे दोन मित्र जम्मूमध्ये अगदी घरच्या वातावरणात राहत आहेत.
मलिक कुटुंबाने माणुसकी जपत केवळ आधार दिला नाही; तर आम्हाला कुटुंबीयांचा दर्जा दिला. 'जम्मू मध्ये आमची करोना टेस्ट करण्याची वेळ आली तेव्हा इथल्या रुग्णालयात आमच्याबरोबर नाझीम यांचा मुलगा अझीम स्वतः आठ ते दहा दिवस क्वारंटाइनमध्ये होता. आम्हाला एकटे वाटू नये, यासाठी तो आमच्याबरोबर रुग्णालयात राहिला. हा सुखद अनुभव आम्हाला बळ देणारा होता,' असे नचिकेतने सांगितले. सध्या आम्ही या कुटुंबाबरोबर धमाल करत असून गप्पा, क्रिकेट, गाणी, उर्दूचे प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी करायला मिळत आहेत. ही खरी काश्मिरीयत असून इथले लोक माणुसकीचा खजिना असल्याचे नचिकेतने नमूद केले.
........
आम्ही अत्यंत नशीबवान आहोत की जम्मूमध्ये मलिक कुटुंब आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी आम्हाला कुटुंबीयांचा दर्जा दिला. आम्ही महाराष्ट्रात जरी कुठे अडकलो असतो, तरी इतके प्रेम मिळाले नसते. ही माणुसकी कधीही न विसरण्यासारखी आहे.
- नचिकेत गुत्तीकर
---
ही मुले आमच्याच कुटुंबाचा भाग असल्यासारखी वाटतात. ते कितीही दिवस इथे राहू शकतात. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही त्यांची काळजी घेतली आहे. ते नागरिकही या मुलांची आपुलकीने विचारपूस करतात.
- नाझीम मलिक
...........
'आई- बाबांसाठी घरी यायचे आहे'
जम्मूमध्ये जरी कुटुंबासारखे वातावरण असले, तरी आमचे आई-बाबा घरी एकटे आहेत आणि ते वयाने ज्येष्ठही आहेत. अशा वेळेला त्यांच्याजवळ राहणेही गरजेचे आहे. म्हणूनच सरकारने आम्हाला पुण्यापर्यंत पोहोचवावे,' अशी विनंती नचिकेत गुत्तीकरने केंद्र सरकारकडे केली आहे.
..........