म. टा. प्रतिनिधी, पुणे अभिजात चित्रपटांच्या निर्मितीने भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णयुगात नेणाऱ्या 'प्रभात फिल्म कंपनी'चे मराठी जनामनांवर असणारे गारुड अजूनही कसे कमी झालेले नाही, याची प्रचितीच अनेकांना सकाळी आली. 'प्रभात'च्या स्थापनेला शनिवारी ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणेकरांना हे 'प्रभात'क्षण पुन्हा एकदा अनुभवता आले. विशेष म्हणजे, यासाठी प्रभात उभी करणाऱ्या विष्णूपंत दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, के. धायबर आणि सीतारामपंत कुलकर्णी यांचे वंशजदेखील आवर्जून हजर होते. 'संत ज्ञानेश्वर', 'कुंकू', 'शेजारी', 'संत तुकाराम', 'अयोध्येचा राजा' अशा अनेक अभिजात चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत सुवर्णयुग आणणाऱ्या 'प्रभात फिल्म कंपनी'च्या स्थापनेला शनिवारी (१ जून) ९० वर्षे पूर्ण झाली. मराठी मातीत जिची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पुढे जी अवघ्या भारताच्या अभिमानाचा विषय ठरली, अशा 'प्रभात'च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण सकाळपासूनच राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) जमायला सुरुवात झाली होती. 'एफटीआयआय'च्या प्रांगणात आजही दिमाखात उभ्या असणाऱ्या प्रभात स्टुडिओत या वेळी एखाद्या सोहळ्याचे वातावरण अनुभवण्यास मिळाले. प्रभात वस्तूसंग्रहालयातील दुर्मीळ वस्तू आणि छायाचित्रे पाहण्यासाठीही लोकांनी गर्दी केली होती. या वेळी 'प्रभात'च्या पाच संस्थापकांना अभिवादन करण्यात आले. विष्णुपंत दामले यांचे नातू अनिल व विवेक दामले 'मटा'शी बोलताना म्हणाले, की आमचा जन्म प्रभातच्या अस्तानंतरचा; तरीही लहानपणापासून कुठल्या ना कुठल्या संदर्भात आमच्या घरात प्रभातचा संबंध नेहमीच टिकून राहिला आहे. प्रभातच्या अनेक चित्रपटांचे डिजिटायझेशन होण्याच्या प्रक्रियेचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही प्रभातचा काळ अनुभवला नसला, तरी या वारशाशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. या वेळी प्रभात स्टुडिओची उभारणी करणारे कंत्राटदार आंबेकर यांचे नातू महादेव श्रीकांत आंबेकर हेही उपस्थित होते.
पुणेकर जगले 'प्रभात'क्षण
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2019, 4:00 am