म. टा. प्रतिनिधी, पुणे
'करोना' विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात अघोषित संचारबंदीची परिस्थिती असून, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास अडचणी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला आणि किराणा जिन्नस विकण्यास परवानगी दिली असली, तरी ही दुकानेही बंद करण्यात येत आहेत. मेडिकल व्यावसायिकांप्रमाणे पुरेशी खबरदारी घेऊन या वस्तूंची विक्री करणे शक्य असतानादेखील ही दुकाने बंद होत असल्याने नागरिक वेठीस धरले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जीवनाश्यवक वस्तूंचा साठा करू नये, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केली आहे. मात्र, सध्या शहरात काही भागांत किराणा मिळणे अवघड झाले आहे. काही संघटनांकडून ही सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात काही उत्साही कार्यकर्त्यांकडून जबरदस्तीने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद करण्यात येत आहेत. त्यात पोलिसांचीही भर पडत असून, काही व्यावसिकांना तर दुकाने सुरू ठेवण्यासाठी पैसे मागण्यात येत असल्याचे प्रकार दबक्या आवाजात चर्चिले जाऊ लागले आहेत. या प्रकारांमध्ये नागरिक भरडले जाऊ लागले आहेत.
'बाजार समितीच्या आवारामध्ये आवक होणारे अन्नधान्य, कडधान्य, फळे, ज्वारी, तांदुळ, तूरडाळ, हरभरा डाळ, कांदा, बटाटा, आदी व्यापार सुरळीत राहणे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बाजार समितीचे मुख्य बाजार आणि उपबाजार बंद ठेवण्याने नागरिकांना भाजीपाला मिळविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होत असून, दरवाढही होण्याची भीती आहे. सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या स्तरावर सर्व बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत राहील, असे पाहावे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्रीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,' अशी सूचना पणन संचालक सुनील पवार यांनी केली आहे.
मटा भूमिका
'करोना'चा फैलाव रोखण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडून त्याचा तुटवडा जाणवू लागला, तर नागरिकांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करून दुकाने खुली करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. वेळ आल्यास या वस्तुंच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे किंवा जीवनावश्यक वस्तूंचा साठा ताब्यात घेण्यासारख्या कारवाईची तयारी ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. विविध राजकीय पक्ष-संघटना-पोलिस आणि लोकप्रतिनिधींनीही आपल्या परिसरात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुरळीत मिळतील, यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.