म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे, शेतमालास हमी भाव देण्याचे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेऊन, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जनतेला, शेतकऱ्यांना फसवले आहे. पण एका निवडणुकीत फसवले, तसे पुढच्या निवडणुकीत फसवता येणार नाही,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबईदरम्यान २२ ते ३० मे या कालावधीत आत्मक्लेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा प्रारंभ फुले वाड्यातील महात्मा फुले स्मारकास अभिवादन करून झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांसह या पदयात्रेत तृतीयपंथी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलेही सहभागी झाली आहेत. आत्मक्लेश यात्रेतून भविष्यात जनआंदोलन उभारले जाणार आहे. ही पदयात्रा नऊ दिवस चालेल. येत्या ३० मे रोजी राज्यपालांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तसेच, सातबारा कोरा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे शेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, लक्ष्मी त्रिपाठी, शिवसेने पदाधिकारी लक्ष्मण वडले, सतीश काकडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना माहिती असूनही अद्याप त्यांनी संपर्क साधला नाही. सरकारला आता सत्तेचा माज आला आहे,’ असे शेट्टी यांनी सांगितले. आत्महत्येनंतर शेतकऱ्यांची आवहेलना केली जाते. आपण ‘जय जवान, जय किसान’चा नारा देतो. जवानांच्या निधनानंतर, ते शहीद झाल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचाही सन्मान करावा, अशी मागणी डॉ. आढाव यांनी केली.
‘देशातील शेतकरी समाधानी नसून त्यावर हे सरकार काही करताना दिसत नाही. तसेच निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार, हे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले होते. अच्छे दिन आले पण ते फक्त अदानी आणि अंबानी यांना आले,’ अशी टीका तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी यांनी केली. ‘कर्जामुळे आणि सरकारच्या धोरणामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. मात्र, तुम्ही आत्महत्या करू नका. व्यसन करू नका,’ असे आवाहन आशिष पाटील या मुलाने सर्व उपस्थितांना केले.
‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे, शेतमालास हमी भाव देण्याचे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेऊन, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जनतेला, शेतकऱ्यांना फसवले आहे. पण एका निवडणुकीत फसवले, तसे पुढच्या निवडणुकीत फसवता येणार नाही,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबईदरम्यान २२ ते ३० मे या कालावधीत आत्मक्लेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा प्रारंभ फुले वाड्यातील महात्मा फुले स्मारकास अभिवादन करून झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांसह या पदयात्रेत तृतीयपंथी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलेही सहभागी झाली आहेत. आत्मक्लेश यात्रेतून भविष्यात जनआंदोलन उभारले जाणार आहे. ही पदयात्रा नऊ दिवस चालेल. येत्या ३० मे रोजी राज्यपालांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तसेच, सातबारा कोरा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे शेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, लक्ष्मी त्रिपाठी, शिवसेने पदाधिकारी लक्ष्मण वडले, सतीश काकडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना माहिती असूनही अद्याप त्यांनी संपर्क साधला नाही. सरकारला आता सत्तेचा माज आला आहे,’ असे शेट्टी यांनी सांगितले. आत्महत्येनंतर शेतकऱ्यांची आवहेलना केली जाते. आपण ‘जय जवान, जय किसान’चा नारा देतो. जवानांच्या निधनानंतर, ते शहीद झाल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचाही सन्मान करावा, अशी मागणी डॉ. आढाव यांनी केली.
‘देशातील शेतकरी समाधानी नसून त्यावर हे सरकार काही करताना दिसत नाही. तसेच निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार, हे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले होते. अच्छे दिन आले पण ते फक्त अदानी आणि अंबानी यांना आले,’ अशी टीका तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी यांनी केली. ‘कर्जामुळे आणि सरकारच्या धोरणामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. मात्र, तुम्ही आत्महत्या करू नका. व्यसन करू नका,’ असे आवाहन आशिष पाटील या मुलाने सर्व उपस्थितांना केले.