रमाबाई आंबेडकर महोत्सवात तीनच कार्यक्रम म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महापालिकेच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाचा खर्च तीन लाखांवरून अकरा लाखांच्या घरात गेला आहे. एवढा निधी खर्च करूनही यंदा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अवघे तीनच कार्यक्रम होणार असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जयंतीला दीड महिना उलटल्यानंतर पालिका हा महोत्सव कोणाच्या फायद्यासाठी घेत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती ७ फेब्रुवारीला असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेतला जातो. गेल्या वर्षी या महोत्सवात चर्चासत्र, एकपात्री नाटक, परिसंवाद, महाचर्चा, व्याख्यान, महिला कवी संमेलन, वाद संवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेने यासाठी २ लाख ९५ हजार रुपये निधी खर्च केला होता. मात्र यंदा या महोत्सवासाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च करण्याचा घाट घातला जात आहे. २५ ते २७ मार्च दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसांच्या महोत्सवामध्ये गायक नंदेश उपम, आनंद शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम तसेच स्नेहा गायकवाड यांचे एकपात्री नाटकाचे प्रयोग या कार्यक्रमांसाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप फुले शाहू आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केला. जयंतीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात हा महोत्सव घेण्यात यावा, असा प्रस्ताव आंबेडकर स्मारक समितीने दिला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून रमाबाई यांची जयंती होऊन दीड महिना उलटल्यानंतर हा महोत्सव घेतल्याचे गायकवाड म्हणाले.
महोत्सवाचा खर्च अकरा लाखांवर
पुणे महापालिकेच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाचा खर्च तीन लाखांवरून अकरा लाखांच्या घरात गेला आहे. एवढा निधी खर्च करूनही यंदा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अवघे तीनच कार्यक्रम होणार असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
Maharashtra Times 25 Mar 2016, 3:00 am