म. टा. प्रतिनिधी, पुणे
'नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली, हा सर्रास विपर्यास असून जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडी त्यास मुख्यतः कारणीभूत आहेत,' असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी गुरुवारी केले. 'नोटबंदीचे यशापयश केवळ तीन वर्षांच्या फूटपट्टीवर मोजणे धारिष्ट्याचे होईल. त्यासाठी आगामी किमान वीस वर्षांचा कालावधी गृहित धरावा लागेल,' असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. विनायक आंबेकर लिखित 'नोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा' या कादंबरीचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्यानिमित्ताने अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक विवेक खरे आणि लेखक प्रा. विनायक आंबेकर उपस्थित होते.
'नोटबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे नोटबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होत असताना आजही हवालदिल आहेत. नोटबंदी हा एकमेकांवर चिखलफेक, आरोपप्रत्यारोप पुरता राजकीय मुद्दा नसून तो गंभीर आणि व्यापक विषय आहे,' असे भांडारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, '२०१२च्या गुजरात विधानसभा निवडणुका ते २०१४ च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षात पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाऱ्या अनेक घटना घडल्या. खोट्या नोटा सापडल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या; पण नोटबंदीच्या निर्णयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे या संदर्भात अनेक संभ्रम आणि गुढता निर्माण झाली. बाजारपेठेतील खोट्या नोटांच्या सुळसुळाटामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम दिसू लागला. यामुळे अर्थतज्ज्ञांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करा, अशी मागणी केली.'
'नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली, हा सर्रास विपर्यास असून जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडी त्यास मुख्यतः कारणीभूत आहेत,' असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी गुरुवारी केले. 'नोटबंदीचे यशापयश केवळ तीन वर्षांच्या फूटपट्टीवर मोजणे धारिष्ट्याचे होईल. त्यासाठी आगामी किमान वीस वर्षांचा कालावधी गृहित धरावा लागेल,' असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. विनायक आंबेकर लिखित 'नोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा' या कादंबरीचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्यानिमित्ताने अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक विवेक खरे आणि लेखक प्रा. विनायक आंबेकर उपस्थित होते.
'नोटबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे नोटबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होत असताना आजही हवालदिल आहेत. नोटबंदी हा एकमेकांवर चिखलफेक, आरोपप्रत्यारोप पुरता राजकीय मुद्दा नसून तो गंभीर आणि व्यापक विषय आहे,' असे भांडारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, '२०१२च्या गुजरात विधानसभा निवडणुका ते २०१४ च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षात पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाऱ्या अनेक घटना घडल्या. खोट्या नोटा सापडल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या; पण नोटबंदीच्या निर्णयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे या संदर्भात अनेक संभ्रम आणि गुढता निर्माण झाली. बाजारपेठेतील खोट्या नोटांच्या सुळसुळाटामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम दिसू लागला. यामुळे अर्थतज्ज्ञांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करा, अशी मागणी केली.'