अ‍ॅपशहर

तंत्रज्ञानाचा होतोय अतिरेक

म टा...

Maharashtra Times 10 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सामाजिक व राजकीय अस्थिरता, सांस्कृतिक आक्रमण, तंत्रज्ञानाचा अतिरेक अशा काळात कला जतन करणे मोठे आव्हान झाले आहे,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी रविवारी व्यक्त केले. 'आपल्याकडे लोकांना संगीत ऐकायला आवडते. संगीतावरील चर्चा ऐकायला किंवा पुस्तक वाचायला नको वाटते. कोणतीही अमूर्त कला समजून घेण्यासाठी चर्चा व चिंतन आवश्यक आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्यातर्फे प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार' डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, गायक संजीव अभ्यंकर, लता साठे, संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे व फाउंडेशनचे शारंग नातू उपस्थित होते.

'स्वरांच्या वाटेवर थांबता येत नाही. पुढे चालावेच लागते. संगीताचा वारसा जबाबदारीने आणि जाणिवेतून पुढे नेणाऱ्या कलावंतांमध्ये अश्विनीचा समावेश आहे,' असे गौरवोद्वगार काढून अत्रे म्हणाल्या, 'जाणते रसिक हवे आहेत. ते असतील, तर कलेचा स्तर उंचावतो. संगीत आणि शास्त्र यांचे नाते बिंब आणि प्रतिबिंब असे आहे. शास्त्र आणि परंपरा याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. विकासाची वाट अडवून चालत नाही. नियमांच्या चौकटीत राहून सर्जनशीलतेची वाट शोधायची असते.'

'इतर गायकांचे गाणे ऐकायला फार कमी कलावंत आवर्जून जातात. अश्विनीताई त्यांच्यापैकीच एक आहेत. शिका, ऐका, पारखून पहा असा शास्त्रीय संगीताचा नियम आहे. अश्विनीताई रंजक गातेच; पण संगीतविद्या व्यापक करण्याचा प्रयत्न ती करते आणि निर्व्याज प्रेमही करते. मूल्य जपून संगीत साधना करणाऱ्यांपैकी ती एक आहे. शोध घेण्याचा तिचा पिंड आहे. ती खूप वरच्या दर्जाची कलाकार आहे,' अशी भावना अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

उत्तरार्धात अश्विनीताईंची अभिजात गायन मैफल रंगली. साधनेतून प्रकटणाऱ्या त्यांच्या गायकीचा रसिकांनी आनंद घेतला. आलापी गायनाच्या नितांत सुंदर व सुश्राव्य सायंकालीन मैफलीचा अनुभव रसिकांना मिळाला. धनाश्री घैसास व ऋतुजा लाड यांनी सहगायन केले. भरत कामत (तबला) व मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. सविता हर्षे यांनी सूत्रसंचालन केले.

संगीताचा इतर कलांशी व ज्ञानशाखांशी संबंध आहे; म्हणूनच संगीत परंपरेचा अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. राग ही कल्पना अमूर्त असली, तरी प्रकट होताना रागाची मूर्ती आकार घेते आणि अनुभूती मिळते. संगीताची भाषा समजून घेतली, तर आपण आनंद घेऊ शकतो.

- डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज