खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलिस ठाणे, चौक्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असून यामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी पोलिसांनी अगोदर राजकीय गुन्हेगारीचा बिमोड करावा, राजकीय हस्तेक्षपाला आळा घालावा,' अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तसेच, तडीपार गुंड राजरोसपणे शहरात फिरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसाठी फोन करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (४ ऑक्टोबर) खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभम, अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांची भेट घेतली. या वेळी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, अनंत कोऱ्हाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, 'राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच शहरातील सामूहिक गुन्हेगारी वाढली आहे. राजाश्रय मिळत असल्याने गुंडाची दहशत वाढली आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे हा राजश्रय मोडित काढणे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शहरातील गुन्हेगारी कमी होणार नाही. तडीपार केलेले गुन्हेगार राजरोसपणे शहरात वास्तव्य करतात. वाकड, थेरगाव परिसरात सर्रासपणे तडीपारांचा वावर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध धंदे सुरू आहे. पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेला पोलिसांकडून योग्य वागणूक दिली जात नाही. परस्पर सेटलमेंट करण्याची भाषा पोलिसांकडून केली जाते.'
'औद्योगिकनगरीची ओळख पुसली जाऊ लागली असून बलात्कार, गुन्हेगारांची नगरी अशी ओळख होत असून, हे अतिशय निंदनीय आहे. औद्योगिक पट्ट्यात दहशत माजविली जात असल्यामुळे उद्योगधंदे शहराबाहेर जात आहेत, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे,' असेही बारणे म्हणाले.