म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, कलम ३७०, भारत-पाकिस्तान, राम मंदिर-बाबरी मशिद याबाबतचे कुठलेही विषय, तसेच जाती धर्मांबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय 'फिरोदिया करंडक' विविध गुणदर्शन स्पर्धेत मांडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या विषयांशी संबंधित सादरीकरण केल्यास त्याचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. काही वर्षांत त्याच-त्याच विषयांचे सादरीकरण, विषय वैविध्याचा अभाव, न कळत्या वयात उथळ मांडणी आणि विषयाची खोली नसताना शेरेबाजी अशी कारणे आयोजकांनी दिली आहेत.
सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी या संस्थेतर्फे फिरोदिया करंडक आंतरमहाविद्याालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा ४५ वर्षांपासून आयोजित करण्यात येते. विषयाच्या बाबतीत बंधने घालण्याचा निर्णय आयोजकांनी पहिल्यांदाच घेतला आहे. १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा होणार असल्याने तशी सूचना आयोजकांनी सर्व कॉलेज आणि विद्यार्थी संघाला दिली आहे. 'रंगमंचावरील चित्रपट' असे या स्पर्धेचे वर्णन केले जाते.
'सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वादग्रस्त विषयांचे सादरीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सादरीकरण केल्यास पूर्वसूचना न देता संबंधित संघाचा सांघिक अथवा वैयक्तिक पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही,' असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
----------
आयोजक म्हणतात...
- सामाजिक सलोखा बिघडू नये याचे भान बाळगा, असे आवाहन करूनही विद्यार्थी ते गंभीरपणे घेत नाहीत. सामाजिक-राजकीय वातावरण अतिसंवेदनशील झाले आहे. समाजात जात-धर्म, मंदिर-मशिद, भारत-पाकिस्तान याच विषयांची सातत्याने चर्चा होत आहे. स्पर्धेमध्येही केवळ हेच विषय डोकावत आहेत.
- विषयांमध्ये तोचतोचपणा येऊ लागल्याने कलाविष्कारातील वैविध्य हरपले आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीतील नऊ सादरीकरणांपैकी पाच सादरीकरणे याच विषयांशी संबंधित होती. विद्यार्थ्यांनी या विषयांच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार करावा, अशी अपेक्षा आहे.
- सादरीकरणातील पात्राला जात, धर्म असू शकतो; पण त्याचा आधार घेऊन शेरेबाजी करण्यास मनाई आहे. - दुष्काळ, शेती, शेतकरी, रोजगार, आर्थिक मंदी, आदिवासी, सरकारची धोरणे अशाही अनेक प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे.
- निर्बंध कायमस्वरूपी नाहीत. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला रोखण्याचाही हेतू नाही. महाविद्यालयीन वयात किंवा हौशी पातळीवर संवेदनशील विषयांवर कशा पद्धतीने भाष्य करावे याची समज नसते. विद्यार्थ्यांनी सादर केलेली संहिता आणि प्रत्यक्ष सादरीकरण यात तफावत आढळली आहे. विद्यार्थी उथळपणे काय सादर करतील याचा नेम नाही.
- अर्वाच्च शिवीगाळ, अश्लील चाळे टाळायला हवेत. काही प्रश्न निर्माण झाले तर संयोजक म्हणून नैतिक जबाबदारी आमची आहे. वयाप्रमाणे प्रगल्भता नसल्याने आपण पातळी कधी सोडतोय, हे विद्यार्थ्यांना कळत नाही, अशी भूमिका आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी मांडली.
---------