म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील गणेशोत्सव मंडळांवर गेल्या चार वर्षांत ५०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य सरकारने ते काढून घेण्यात यावेत, अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांनी कले आहे. बालगुडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून त्यात गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
'पुण्याच्या गणेशोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २००० सालापालून मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. तत्कालीन दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याच्या कार्यकालात कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. मात्र, या सरकारच्या काळात गेल्या चार वर्षांत ५०० हून अधिक गुन्हे दाखल असून ते मागे घेण्यात आलेले नाहीत. त्याच वेळी राज्य सरकारने राजकीय नेत्यांवरील खटले मागे घेतले आहे. वादग्रस्त संभाजी भिडे यांच्यावरीलही गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मात्र, गणेशोत्सव मंडळांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत,' असे बालगुडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येत आहे. सरकार या जयंतीला गुन्हेगारांची शिक्षा माफ करते. कार्यकर्ते हे गुन्हेगार नसून समाजासाठी धावणारे असल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी विनंती बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
.........