विविध प्रलंबित मागण्यांचा जाहीरनामाही केला प्रसिद्ध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच राजकीय पक्षांनी रिक्षाचालकांचा फक्त मतदान आणि प्रचारासाठी वापर करून घेतला आहे. त्यामुळे आता आमचे प्रश्न जो सोडवेल; तोच आमचा खासदार, अशी घोषणा करून शहरातील विविध रिक्षा संघटनांनी शहरात शुक्रवारी 'बहिष्कार रिक्षा रॅली' काढून आपली ताकद दाखवून दिली. रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा, खासगी कॅब कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणा, अत्याधुनिक प्रीपेड थांबे उभारा आदी मागण्यांचा जाहीरनामाही रिक्षा व्यावसायिकांनी जाहीर केला.
पी. एस. अमर ऑटो रिक्षा संघटना, मातोश्री रमाबाई आंबेडकर संघटना, आम आदमी रिक्षा संघटनेसह विविध रिक्षा संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून रिक्षा रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये चारशेहून अधिक रिक्षा चालक आपल्या रिक्षांसह सहभागी झाले होते. प्रवाशांना मीटरप्रमाणे प्रमाणिक सेवा देण्यासाठी राज्य सरकारने रिक्षा अॅप सुरू करावे, ओला- उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांवर कायदेशीर नियंत्रण आणावे, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, रिक्षा चालकांची कर्जमाफी करावी, स्मार्ट सिटीमध्ये रिक्षा चालकांना समाविष्ट करून अत्याधुनिक प्रीपेड रिक्षा थांबे सुरू करावेत, रिक्षांचा इन्शुरन्स कमी करावा, सीएनजीचे दर कमी करावे, रिक्षा भाडे वाढवावे, रिक्षा परमिट, टुरिस्ट परमिट बंद करावे, शहरात नवीन ब्रेक टेस्टिंग ट्रॅक तयार करावा, अशा विविध मागण्यांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याची भूमिका संघटनांनी स्पष्ट केले.
...
रिक्षाचालकांना घेतले ताब्यात
पी. एस. अमर ऑटो रिक्षा संघटनेने 'बहिष्कार रिक्षा रॅली'साठी पोलिसांकडे पत्र दिले होते. त्यानुसार पुणे स्टेशन, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, स्वारगेट, मुकुंदनगर, गुलटेकडी, मालधक्का चौकामार्गे पुन्हा पुणे स्टेशन या मार्गाने रॅली जाणार होती. मात्र, पोलिसांनी स्वारगेट येथे रॅली थांबवून ती विनापरवाना असल्याचे सांगून काही रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल केले.
...
आज ठरणार दिशा
आम आदमी रिक्षा संघटनेच्यावतीने आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता सारसबागेत शहरातील सर्व रिक्षा चालकांची बैठक आयोजित केली आहे. रिक्षा व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मिळून एक ते दीड लाख मतदान आहे. मतदान कोणत्या उमेदवाराला करायचे, मतदान करायचे की बहिष्कार टाकायचा, 'नोटा'चा पर्याय वापरायचा का, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, असे आम आदमी रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य यांनी सांगितले.