(मटा इम्पॅक्ट)
आयआरसीटीसीच्या दरानेच विक्रीचे अधिकृत पँट्री चालकांवर बंधन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने केली जाणारी आकारणी येत्या काळात बंद होणार आहे. रेल्वेतील अधिकृत पँट्री चालकांनी 'आयआरसीटीसी'च्या दराने विक्री करावी आणि प्रवाशांना पक्के बिल देखील द्यावे, यासाठी त्यांना पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिन दिल्या जाणार असून, त्याचा वापर बंधनकारक केला जाणार आहे. या मशिनमध्ये 'आयआरसीटीसी'ने निश्चित केलेले नमूद केले जाणार आहेत.
लांब पल्ल्याच्या रेल्वेमधील पँट्री कारमध्ये दिलेले जाणारे खाद्यपदार्थ हे 'आयआरसीटीसी'ने निश्चित करून दिलेल्या दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक दराने प्रवाशांच्या माथी मारले जात असल्याचे दिसून असल्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणला होता. 'आयआरसीटी'च्या दरपत्रकानुसार प्रवाशांना चहा पाच रुपये, कॉफी सात रुपये, व्हेज थाळी ५० रुपयांत, नॉनव्हेज थाळी ५५ रुपयात देणे अपेक्षित आहे. मात्र, पँट्रीकारमध्ये चहा १० व १५ रुपये, कॉफी २० व २५ रुपये, व्हेज, नॉनव्हेज थाळी १२० रुपयांना दिली जाते. रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असून, नियमबाह्य दर आकारणीतून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होत असण्याची दाट शक्यता आहे. डेक्कन क्वीनमध्ये कंत्राटदाराने उपलब्ध करून दिलेल्या 'रेटकार्ड'नुसार व्हेज कटलेट (दोन नग) ४९ रुपये, टोस्ट किंवा ब्रेड बटर ४७ रुपये, चीज सँडवीच ३८ रुपये, चीज टोस्ट ३२ रुपये, ऑम्लेट ब्रेड ४९ रुपये, चिकन कटलेट ७० रुपये याप्रमाणे दर आकारण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे 'आयआरसीटीसी'ने या प्रकाराची दखल घेऊन पँट्रीकार चालक-कंत्राटदारांच्या या प्रकाराला ताप लावण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बेंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन दिले जाणार आहेत. या मशिनवरून प्रवाशांना खाद्यपदार्थांनुसार बिलही दिले जाणार आहे.
.............
'आयआरसीटीसी'चे दर प्रत्यक्ष दरआकारणी (रुपयात)
चहा - ७ १० ते १५
कॉफी - ७ २० ते २५
पाणी बाटली (१ लिटर) -१५ १५
जनता खाना -१५ ३५ ते ५०
शाकाहारी नाश्ता -२५ ४५
मांसाहारी नाश्ता-३० ५०
शाकाहारी जेवण -४५ १२०
मांसाहारी जेवण -५० १२०
............
प्रवाशांनो सजग व्हा
रेल्वे प्रशासन व 'आयआरसीटीसी'कडून 'खानपान' सेवेच्या दरांबाबत सातत्याने प्रवाशांची जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. रेल्वे प्रवासात प्रवाशांकडून निश्चित दरांपेक्षा जास्त दर आकारला जात असल्याचे निदर्शनास आल्यास रेल्वे प्रशासनाच्या उपलब्ध कोणत्याही व्यासपीठावर त्याची तक्रार करावी. सजग प्रवाशांची साथ लाभल्यास या प्रकाराला पूर्णपणे अटकाव घालता येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
.................