साक्षी माथवड हिला
श्री शिवछत्रपती पुरस्कार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देव सिंहासनी बैसले' या संत तुकाराम महाराजांच्या ओवीवर आधारित विविध मुद्यांवर कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन करून, निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी श्रोत्यांची मने जिंकली. श्री तुळजाभवानीमाता आणि श्री राधाकृष्ण सेवा संस्थेतर्फे श्री राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन प्रवचनांच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांचे व्याख्यान झाले. या वेळी कोथरूडची कन्या साक्षी माथवड हिला नुकताच श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. इंदुरीकर महाराज यांनाही उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील उपस्थित होते. माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कुटुंबपद्धती, मुलांवरील संस्कार, आई-वडिलांचे व मुलांचे अधिकार, कर्तव्ये अशा विविध मुद्द्यांवर इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाद्वारे प्रबोधन केले.
000
'अपयशाला संधी मानायला हवे'
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आयुष्यात आपण रोज कोणती ना कोणती लढाई लढतो. त्यात प्रत्येक वेळी यश येतेच, असे नाही; परंतु अपयशाने खचून न जाता आपली लढाई कायम ठेवली पाहिजे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी बाळगले पाहिजे. अपयश प्रत्येकालाच येते; परंतु अपयशाला संधी मानून पुढे वाटचाल करणे महत्त्वाचे असते,' असे मत निवृत्त लष्करी अधिकारी रितू बियाणी यांनी व्यक्त केले.
महेश प्रोफेशनल फोरमतर्फे एमआयटी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'महेश आयडॉल' स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान आणि पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. महेश प्रोफेशनल फोरमचे विश्वस्त पंकज मदानी, श्रुती करनानी, अंकिता कासट, योगेश इंदाणी, आशिष लोहिया, सुरेश लखोटिया, महेश चांडक, विकास राठी, योगेश जाजू उपस्थित होते.
प्राथमिक फेरीत राज्याच्या विविध भागांत घेण्यात आलेले ६०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अजय पुनपाले, बादल राठी, मधुर झंवर, मनोज राठी, निकिता बाहेती, प्रतिभा बलदावा, सचिन झंवर, विजय भुतडा, विशाल बियाणी या स्पर्धकांची यात निवड करण्यात आली. अंतिम फेरीत अर्चना गिल्डा-डागा यांना महेश आयडॉल पुरस्काराने गौरविण्यात आले.
लष्करात भरती होण्याच्या सुरुवातीच्या काळात मलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले; परंतु त्या अपयशाने खचून न जाता लष्करात कोणत्याही परिस्थितीत जाणारच हा ठाम निर्धार केला होता. त्यामुळे संघर्ष करू शकले आणि लष्करात सहभागी होऊ शकले.
- रितू बियाणी, निवृत्त लष्करी अधिकारी