बॉलिवूड हा शोबिझ बिझनेस आहे. हिरोचे रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि हिरोइनचे आरस्पानी सौंदर्य यावरच त्यांचे वर्तमान, भविष्य लिहिले जाते. हिंदी सिनेमा हा नेहमीच नायकप्रधान राहिला आहे. स्त्रीकेंद्रीत सिनेमांची कितीही लाट आली, तरी कालांतराने ती ओसरते आणि ‘हिरोइझम’चा जुना, यशस्वी ट्रेंड पुन्हा डोके वर काढतो. नेहमीप्रमाणे नायकप्रधान सिनेमांना चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. मग त्या हिरोने वयाची चाळिशी-पन्नाशी का ओलांडलेली असेना. केवळ आपल्या नावाच्या ‘ब्रँड’वर थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्यात हिरो यशस्वी ठरतात. त्या वेळी पटकथा, सिनेमाची धाटणी, हिरॉइन या गोष्टी चाहत्यांसाठी दुय्यमच. म्हणून तर बॉलिवूडवर ‘खान्स’चे प्रस्थ अजूनही शाबूत आहे. वयाची पन्नाशी ओलांडूनही ‘खान्स’ मुख्य भूमिकेत झळकले, प्रेमकथा रंगवल्या तरी त्या चाहत्यांकडून स्वीकारल्या जातात, हे विशेष. मात्र, काळाची पावले आणि त्यानुसार आपल्यात होणारे बदल स्वीकारणे हिरोसाठी नेहमीच फायद्याचे ठरते. अन्यथा, अतिआत्मविश्वासापोटी म्हणा किंवा आहे ते वय न स्वीकारता तरुण, मुख्य भूमिकांचाच आग्रह धरल्यास म्हणा, स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे आहे. ‘ट्यूबलाइट’ प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खानच्या बाबतीत अशीच भीती निर्माण झाली आहे!
सलमान खान! या नावातच एक मोठा ब्रँड दडला आहे. दर वर्षी ईदला केवळ याच नावाचे ‘वेटेज’ थिएटरमध्ये चाहत्यांची गर्दी खेचून आणते. अॅक्शन असो, कॉमेडी असो किंवा लव्हस्टोरी असो, सलमानने आपल्या कारकिर्दीतील सगळ्याच भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ‘प्रेम’ साकारून त्याने कितीतरी हिट सिनेमे देऊन या नावाला ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. आशिक असावा तर असा अशी सुप्त इच्छा तरुणींच्या मनात घर करून राहिली. १९८९मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमापासून त्याचा ‘प्रेम’ सिलसिला सुरू झाला आणि ‘प्रेम रतन धन पायो’पर्यंत (२०१५) तो टिकून आहे. ‘अंदाज अपना अपना’, ‘नो एंट्री’, ‘हम साथ साथ है’, ‘पार्टनर’, ‘सिर्फ तुम’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘जुडवा’, ‘रेडी’, ‘चल मेरे भाई’ या सिनेमातील ‘प्रेम’ ब्रँडने सलमानला उंचीवर नेऊन ठेवले. हे सिनेमे त्याच्या करिअरमधील मैलाचे दगड समजले जातात.
सलमानमध्ये ‘हिरो मटेरिअल’ भरपूर आहे. मात्र, तारुण्याची रेषा पार केलेला, बेढब, थकलेला, चेहऱ्यावर काहीशा सुरकुत्या असलेला हिरो पाहायला आवडेल आपल्याला? नक्कीच नाही! तरीही सलमान खान, शाहरूख खान अजूनही मुख्य भूमिकेत चाहत्यांकडून सहज स्वीकारले जाताहेत. वयाची तब्बल पन्नाशी ओलांडूनही! या वयात हिरो म्हणून त्यांना स्वीकारणे चाहत्यांना गैर वाटत नाही, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मात्र, अभिनयाचे नाणे कितीही चमकणारे असो, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वय बाजूला सारून चालत नाही. ‘वन्स अॅन अॅक्टर ऑल्व्हेज अॅन अॅक्टर’ असे म्हटले जात असताना वयाला अनुसरून भूमिका स्वीकारण्यातच नायकाचे खरे शहाणपण दडलेले असते आणि ‘ट्यूबलाइट’च्या निमित्ताने सलमानला हे शहाणपण लवकर सुचावे!
‘दबंग’नंतर सलमानने वेगळ्या धाटणीचा सिनेमा करायला सुरुवात केली. ‘जय हो’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ या सिनेमांमधून सामाजिक संदेश देण्यावर त्याचा भर असल्याचे स्पष्ट दिसून येते. रोमँटिक आणि अॅक्शन हिरो अशी इमेज सलमानने या सिनेमांतून बदलण्याचा प्रयत्न केला असला, तरी चाहत्यांना ती फारशी भावली नाही. संदेश देणारा एकच सिनेमा करून सलमान थांबला नाही, तर दर पुढच्या सिनेमात त्याची पुनरावृत्ती करत राहिला आणि चाहत्यांना तेच खटकलं. या सिनेमांप्रमाणेच ‘बॉडीगार्ड’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘सुलतान’मध्ये सलमान प्रचंड थकलेला दिसून आला. ‘प्रेम’ किंवा ‘चुलबुल पांडे’सारखा ‘चार्म’ त्याच्यात नव्हता. या सिनेमांची चर्चा झाली खरी; पण वयानुसार सलमानमध्ये झालेले बदल चाहत्यांना दुर्लक्षित करता आले नाहीत. वाढते वय न स्वीकारता केवळ आणि केवळ मुख्य भूमिकेतच झळकायचा सलमानचा आग्रहच त्याचे फिल्मी करिअरला संपवेल, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
हिंदी इंडस्ट्रीची गणिते फार वेगळी आहेत. येथे हिरोइनने वयाची चाळिशी ओलांडली, तर तिचे करिअर आता संपुष्टात आले अशी चर्चा रंगते. मग तिने कितीही चांगल्या भूमिकांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला का असेना. ‘चेहऱ्यावर आता तिचे वय दिसते,’ असे ऐकत त्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारल्या जातात. खरे तर, आपले वाढते वय त्या स्वतःच स्वीकारून मुख्य भूमिकांचा आग्रह सोडतात. पुरुषप्रधान संस्कृतीचाच हा एक दाखला. त्यांची अभिनयसंपन्नता पाहता याही वयात त्यांच्या या पात्रतेला न्याय देण्यासाठी आपल्याकडे हॉलिवूडप्रमाणे सिनेमांची निर्मिती होत नाही. हॉलिवूडमध्ये चाळिशी ओलांडलेल्या हिरोइनसाठी म्हणून खास सिनेमे लिहिले जातात आणि ते ऑस्करपर्यंत पोहोचतात. मेरिल स्ट्रीप, केट विन्स्लेट, ड्रू बेरीमोर, कॅमरोन डियाज, अँजेलिना जोली, ज्युलिया रॉबर्ट्स या अभिनेत्रींना तिथे अजूनही वलय आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या तब्बू, रवीना टंडन, माधुरी दीक्षित, जूही चावला, श्रीदेवी, मधू, काजोल, शिल्पा शेट्टी अशा हिरोइन मागेच आहेत. आपले आहे ते वय सहज स्वीकारून त्या दुय्यम भूमिकांकडे वळतात किंवा सिनेमांमधून ब्रेक घेतात.
हिरोच्या बाबतीत मात्र असे होत नाही. वय हा मुद्दा त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा मानला जात नाही. दिग्दर्शक-निर्माते पन्नाशीतही त्यांचा प्रेमकथेसाठी विचार करतात. आपले वाढते वय स्वीकारायला हिरोला बॉलिवूडच परवानगी देत नाही हेच खरे. म्हणून तर आज सलमान खान मुख्य भूमिकेत टिकून आहे. आमिर खानही पन्नाशी ओलांडलेला. मात्र, नायक म्हणून प्रयोगशील असल्याने त्याच्या वाढलेल्या वयाकडे कधीच लक्ष जात नाही. उलट प्रत्येक सिनेमात त्याचे कौतुकच होते. ‘दंगल’मध्ये तीन मुलींचा बाप साकारण्याचे धाडस त्याने दाखवले. त्यासाठी काहीक वर्षे जबरी मेहनतही घेतली. वयाच्या एकाच टप्प्यावर असल्याने या समकालीन हिरोंना भूमिकांच्या बाबतीत एका रांगेत बसवावे लागतेच.
सलमानच्या बाबतीत भूमिकांमध्ये आता तोचतोचपणा जाणवायला लागला आहे. ‘ट्यूबलाइट’ आणि ‘बजरंगी भाईजान’मधला त्याचा लूक सारखाच वाटतो. दोन्ही सिनेमाची कथा वेगळी असली, तरी पात्र म्हणून त्याची देहबोलीही वेगळी नाही. अभिनयशैलीतही फरक जाणवत नाही. मुख्य भूमिकेच्या आग्रहापोटी नायक म्हणून अंगी असलेल्या प्रतिभेला सलमान जणू स्वतःच कुंपण घालतोय. खरे तरे, वयाच्या या टप्प्यावर आणि येथून पुढे त्याची इंडस्ट्रीत टिकण्याची, अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची कसोटी आहे. या कसोटीला पुरेपूर न्याय देण्यासाठी त्याला संधीही मिळू शकतात किंवा वेगळा विचार करून त्याने त्या स्वतः तयार कराव्यात. यासाठी त्याच्याकडे तशी ‘सुपरब्रेन’ असलेली माणसेही आहेत आणि त्याच्या नावावर पैसे लावणारे निर्मातेही. फक्त त्याने सिनेमात दुय्यम किंवा प्रयोगशील अशी सशक्त भूमिका स्वीकारायला तयार झाले पाहिजे. नायक प्रयोगशीलतेतून घडत असतो आणि त्यातूनच स्वतःचे भविष्यही लिहीत असतो. ‘सावध ऐका पुढल्या हाका,’ यानुसार सलमानने हे वेळीच जाणावे. अमिताभ बच्चनप्रमाणे! सद्यस्थितीत हिंदी सिनेमा बदलत असताना स्वतःच्याच नावाचा ‘ब्रँड’ म्हणून विचार करणे सलमानला परवडणारे नाही. अन्यथा, तोच त्याच्या नायकप्रधान यशोगाथेचा ‘व्हिलन’ ठरेल आणि तमाम चाहत्यांना हे मुळीच पचणार नाही!