म. टा. प्रतिनिधी, पुणे
रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई केल्याबद्दल सफाई कामगाराला झालेल्या मारहाणीमुळे पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छता सर्वेक्षण मोहीम कामगारांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप पुणे महापालिका कामगार युनियनने केला आहे. रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा वर्गीकरण न करणारे नागरिक आणि सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्याची टीका युनियनने केली आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करावे, अशी मागणीही युनियनने केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रात्रपाळीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याबद्दल युनियनने नाराजी व्यक्त केली आहे. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सफाई कर्मचारी तानाजी देवकुळे यांना २ जानेवारीला रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई केल्याबद्दल एका व्यक्तीने बांबूने मारहाण केली होती, तर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कर्मचारी लक्ष्मी खुडे यांना १२ डिसेंबरला सफाई करतानाच नागरिकांकडून मारहाण झाली होती. यापूर्वीही सफाई कामगारांना मारहाणीच्या, शिविगाळाच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत परस्पर बदल केले आहेत. रात्री-बेरात्री सफाई केली जात आहे. रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची, तसेच खासगी जागांवर सफाई करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे कामगार प्रथेचे उल्लंघन होत आहे, अशा तक्रारीही युनियनने केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन कामगार युनियनसोबत बैठक घेऊन स्वच्छ भारत मोहिमेच्या अंमलबजावणीचे निश्चित धोरण ठरवावे, तसेच कामगारांवरील हल्ले रोखावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.