प्रा. शेषराव मोरे यांनी ठणकावले
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'समाजात विचारवंत म्हणून जे मिरवतात; त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली आहे. जातीयवादी म्हणून त्यांना हिणवले. धर्मग्रंथांपेक्षा विज्ञानाचे पान उघडा आणि सर्व हिंदू एकाच रक्ताचे आहेत असे म्हणणाऱ्या सावरकरांना जातीयवादी कसे म्हणता,' असा सवाल करून ज्येष्ठ लेखक आणि व्यासंगी अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी 'सावरकरांना बुद्धिवादाचे प्रमाण मानावे लागेल,' असे शुक्रवारी ठणकावून सांगितले. 'सावरकरांवर होणाऱ्या बदनामीने अस्वस्थ होऊन मी खरे सावरकर कोण, हे समजावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले,' अशी भावनाही मोरे यांनी व्यक्त केली.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांच्या हस्ते अभिनेते मोहन जोशी यांना 'समाजभूषण पुरस्कार', प्रा. शेषराव मोरे यांना 'समाजस्नेह पुरस्कार', उद्योजक संजीव पेंढरकर यांना 'स्व. दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न पुरस्कार', तरुण गायिका आर्या आंबेकर हिला 'युवा गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, संघटनेचे अध्यक्ष अंकित काणे उपस्थित होते.
'सर्वांनी एकत्र नांदावे, असा भाव समाजात निर्माण करण्याची गरज आहे. इतरांशी काय जुळत नाही, हे पाहण्यापेक्षा काय जुळते हेच पाहिले पाहिजे. त्यातूनच शांतता नांदू शकेल,' असे मत तांबे यांनी व्यक्त केले.
'समाजातील महापुरुषांची टिंगल रोखण्याच्या उद्देशाने संघटना स्थापन केली आहे. समाजातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जातो. बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा आमचा संकल्प आहे,' असे काणे यांनी सांगितले.
...
मराठी ब्राह्मण माणसाकडे अमाप बुद्धी आहे; पण ती स्वत:च्या प्रगतीसाठी वापरली जात नाही. अमेरिकेत जाऊन तिथे आयटी कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या हे लोक करतात. स्वत: व्यवसाय सुरू करणारी व्यक्ती पगार मिळविणाऱ्या लोकांपेक्षा कांकणभर सरस असते. समाजातील तरुणांनी व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा.
संजीव पेंढरकर