अ‍ॅपशहर

शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव

लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत त्याचा प्रचार झाला. १९ व्या शतकाच्या अखेरीस पुण्याचा परिसर मध्यवस्तीतील काही पेठांपुरता मर्यादित असला, तरीही प्रत्येक पेठेतून उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शनिवार पेठेत ‘शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने लोकमान्यांपासून प्रेरणा घेत उत्सवाला सुरुवात केली. १८९३ मध्ये स्थापना झालेले हे मंडळ यंदा इतर प्रमुख मंडळांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

Maharashtra Times 30 Aug 2017, 3:00 am
लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत त्याचा प्रचार झाला. १९ व्या शतकाच्या अखेरीस पुण्याचा परिसर मध्यवस्तीतील काही पेठांपुरता मर्यादित असला, तरीही प्रत्येक पेठेतून उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शनिवार पेठेत ‘शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने लोकमान्यांपासून प्रेरणा घेत उत्सवाला सुरुवात केली. १८९३ मध्ये स्थापना झालेले हे मंडळ यंदा इतर प्रमुख मंडळांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shanivar veer maruti sarvajanik mandal pune ganeshotsav pmc pune
शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव

शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या मंडळाने आत्तापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपातील देखावे आणि सजावटीने गणेश भक्तांना आकर्षित केले आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाने तिरुपती येथील व्यंकटेश बालाजी मंदिराचा देखावा उभा केला आहे. हा भव्य देखावा आणि त्यावरील दिव्यांची रोषणाई अत्यंत नेत्रदीपक ठरत आहे. यंदाच्या उत्सवात संपूर्ण दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम/उपक्रम मंडळाने आयोजित केले आहेत.
गणेश उत्सवाप्रमाणेच वर्षभरात मंडळातर्फे इतरही वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. यात प्रामुख्याने शिवजयंती, दत्तजयंती, गणेशजन्म आणि भारतीय स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर इतरही अनेक सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. मंडळाचे अनेक पदाधिकारी वाढदिवसावर केला जाणारा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत करण्यात पुढाकार घेतात. त्याशिवाय, गणेशोत्सवात विधायक कार्यक्रमांवर भर देतानाच गुलालमुक्त आणि डीजे/डॉल्बीला फाटा देत पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मंडळानेही त्याचा प्रचार-प्रसार करण्यात पुढाकार घेतला आहे. मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या वर्गणीच्या पावतीवर ‘स्वच्छ रहें भारत, स्वच्छ रहें हम’ असा संदेश दिला जात आहे. तसेच, येत्या रविवारी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. मंडळात येणाऱ्या पाहुण्यांनाही पुष्पगुच्छ देण्याऐवजी रोप देऊन वृक्ष संवर्धनासाठी मंडळाने पुढाकार घेतल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहित धावडे यांनी दिली.
मंडळाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत ‘श्रीं’च्या दोन मूर्ती बदलण्यात आल्या आहेत. स्थापनेनंतरची पहिली मूर्ती २०-२५ वर्षांत बदलण्यात आली. त्यानंतरची मूर्ती सुमारे ६० वर्षे कायम होती. तर, आत्ताच्या मूर्तीलाही ४२ ते ४५ वर्षे झाली आहेत. मंडळाचे १२५ वे वर्ष सुरू असले, तरी सध्या मंडळाचे सर्व व्यवस्थापन तरुण पिढीच्या हाती असून, सरासरी वय पंचविशीच्या आत आहे. त्यामुळे, सव्वाशे वर्षांचा वारसा यापुढेही जोमाने सुरू राहील, हीच अपेक्षा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज