मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
'हवामान खात्याचा पावसासंबंधीचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. पाऊस पडताच पवार यांनी हवामान खात्याला एक-दोन किलो नव्हे तर तब्बल शंभर किलो साखर पाठवली आहे. त्यामुळे सध्या पवार आणि बारामतीची साखर राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शनिवारी हवामान खात्याची खिल्ली उडविणारं हे वक्तव्य केलं होतं. 'राज्यात पाऊस होण्यासंबधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं ते म्हणाले होते. पवारांचं हे वक्तव्य मेघराजाच्या जिव्हारी लागलं की काय? दुसऱ्या दिवशीच मेघराजाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. एवढंच नव्हे तर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर अतिवृष्टी झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाल्याने पवारांनी वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी बारामतीवरुन १०० किलो साखर पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.
हवामान खात्याने गेल्या आठवड्यात पावसासंबंधी व्यक्त केलेल्या अंदाजात आणि परिस्थितीत तफावत आढळली होती. त्यानंतर तर हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता. त्यावरून हवामान खात्याची खिल्लीही उडवण्यात आली होती. शरद पवार यांना याबाबत बारामतीत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करत हवामान खात्याला चिमटा काढला होता. पवार यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत हवामान खात्याची `कार्यक्षमता` उघड केली होती. मात्र वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस होताच पवारांनी त्यांचा शब्द पाळला.
'हवामान खात्याचा पावसासंबंधीचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. पाऊस पडताच पवार यांनी हवामान खात्याला एक-दोन किलो नव्हे तर तब्बल शंभर किलो साखर पाठवली आहे. त्यामुळे सध्या पवार आणि बारामतीची साखर राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शनिवारी हवामान खात्याची खिल्ली उडविणारं हे वक्तव्य केलं होतं. 'राज्यात पाऊस होण्यासंबधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं ते म्हणाले होते. पवारांचं हे वक्तव्य मेघराजाच्या जिव्हारी लागलं की काय? दुसऱ्या दिवशीच मेघराजाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. एवढंच नव्हे तर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर अतिवृष्टी झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाल्याने पवारांनी वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी बारामतीवरुन १०० किलो साखर पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.
हवामान खात्याने गेल्या आठवड्यात पावसासंबंधी व्यक्त केलेल्या अंदाजात आणि परिस्थितीत तफावत आढळली होती. त्यानंतर तर हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता. त्यावरून हवामान खात्याची खिल्लीही उडवण्यात आली होती. शरद पवार यांना याबाबत बारामतीत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करत हवामान खात्याला चिमटा काढला होता. पवार यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत हवामान खात्याची `कार्यक्षमता` उघड केली होती. मात्र वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस होताच पवारांनी त्यांचा शब्द पाळला.