उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन
Sachin.Waghmare@timesgroup.com
Twitter : @
उस्मानाबाद : मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या उस्मानाबादमध्ये आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि उस्मानाबादच्या नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मराठवाड्यात १६ वर्षांनंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या रुपाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्रांगणात शारदेचा दरबार फुलणार आहे.
संत गोरोबा काकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीने साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून पताका कायम फडकावित ठेवली आहे. मराठवाड्यात साहित्य संमेलन व्हावे, अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे आठ वर्षांपासून केली जात होती. यामध्येही उस्मानाबादला आतापर्यंत कधीच साहित्य संमेलन झाले नव्हते. त्यामुळे, उस्मानाबादला संधी मिळावी, अशी विशेष मागणी होत होती. ही मागणी यंदा पूर्ण झाल्यामुळे उस्मानाबादवासीयांची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. २०१४ पासूनच उस्मानाबादच्या साहित्यिक आणि रसिकांकडून प्रयत्न करण्यात येत होते. त्यावर्षी विशेषत्वाने प्रयत्न केल्यानंतर, अचानक हे संमेलन पंजाबमधील घुमान येथे करण्याचे ठरले. त्यामुळे साहित्यिकांचा काहीअंशी हिरमोड झाला. त्याचवर्षी उस्मानाबाद येथील साहित्यिकांनी 'गोरोबांची दिंडी, नामदेवाच्या भेटी' म्हणून दोनशे साहित्यिक घुमान येथील संमेलनात भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते.
साहित्य महामंडळाचा कारभार तीन वर्षांच्या काळात विदर्भ साहित्य मंडळाकडे असल्याने मराठवाड्याला संधी मिळाली नव्हती. यावर्षी मराठवाड्याकडे ही संधी आल्याने येथील साहित्य परिषदेचे कार्यकर्ते अग्रेसर होते. संमेलनस्थळाची पाहणीसाठी पथक आल्यानंतर सर्व तयारी पूर्ण करून ठेवली होती. त्यामुळे उस्मानाबादला हे संमेलन करण्याची संधी मिळाली, सर्वच सदस्यांनी उस्मानाबादला पसंती दिली, हे विशेष. हे संमेलन मराठवाड्यात होत असल्याने मराठवाड्याला मिळालेला सांस्कृतिक न्याय आहे, अशा शब्दांत काही साहित्यकांनी आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने परिसरातील कवी, लेखक, समीक्षकांना मोठ्या व्यासपीठावर जाण्याची संधी मिळणार आहे.
मराठवाड्यातील सातवे संमेलन
मराठवाड्यातील हे सातवे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी १९५७ मध्ये औरंगाबाद, १९८३ मध्ये अंबाजोगाई, १९८५ मध्ये नांदेड, १९९५ मध्ये परभणी, १९९८ परळी, तर २००४ मध्ये औरंगाबादमध्ये संमेलन पार पडले होते.
उस्मानाबादमध्ये जल्लोष
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमानपदाचे निमंत्रण उस्मानाबादला मिळाले. हे निमंत्रण पत्र घेऊन उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, रवींद्र केसकर, बालाजी तांबे व माधव इंगळे आल्यानंतर येथील शिवाजी चौकात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.