म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील एक महत्त्वाची शिक्षणसंस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानेही रस घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही प्रमुख आणि या संस्थेतील एका माजी सत्ताधारी प्रभावशाली गटाने परिवर्तन पॅनेलची मोट बांधली असून, पूर्वीच्या नियामक मंडळातील दोन सदस्यही या पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने निवडणुकीला रंग चढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर आणि चिपळूण अशा ठिकाणी ४० शाळा-कॉलेजेस असलेल्या या शिक्षणसंस्थेत जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शिक्षणक्षेत्रात या संस्थेचा मोठा दबदबा आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी परिवर्तन पॅनेलची मोट बांधण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही प्रभावशाली व्यक्तिंनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. तसेच उमेदवार निवडीसंदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक ‘हाय प्रोफाइल’ बनली आहे. त्याबरोबरच संस्थेतील माजी पदाधिकारी सुनिल राडकर यांचाही आशीर्वाद या पॅनेलला असल्याचे सांगण्यात येते. पूर्वीच्या सत्ताधारी पॅनेलमधील जयंत किराड आणि सतीश पवार हे नियामक मंडळाचे माजी सदस्य परिवर्तन पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत; तसेच आमदार माधुरी मिसाळ याही या पॅनेलतर्फे निवडणूक लढवित आहेत. येथील विविध शिक्षणसंस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मानणाऱ्यांची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक प्रभावशाली शिक्षणसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी ही चढाओढ सुरू झाल्याचे सांगण्यात येते. या पॅनेलमध्ये श्रीकृष्ण चितळे, ज्येष्ठ वकील एस. के. जैन, वसंत देसाई, मिहीर प्रभुदेसाई, दामोदर भंडारी आणि अशोक वझे यांच्यासह पुरुषोत्तम कुलकर्णी व राजेश पटवर्धन (सोलापूर) आणि सुरेश देवळे (मुंबई) यांचा समावेश आहे. दोन्ही पॅनेलमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. येत्या बुधवारी (३० मार्च) मतदान होणार असून यंदा प्रथमच मतदारांनी मतदान केंद्रांवर येऊन मतदान करण्याची तरतुदही वादात सापडली आहे.
‘शिप्र’ निवडणुकीत ‘सीएमओ’चे लक्ष
शहरातील एक महत्त्वाची शिक्षणसंस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानेही रस घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
Maharashtra Times 25 Mar 2016, 3:00 am