बापट यांनी खुलासा करण्याची जगताप, शिंदेंची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून भाजपने उमेदवारी नाकारली की, निष्क्रिय खासदार म्हणून याचा खुलासा सरदार घराण्यांच्या वंशजांचा मेळावा घेणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी करावा,' अशी मागणी माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी केली.
भाजपतर्फे गुरुवारी बापट यांच्या समर्थनार्थ 'स्वराज्य बांधवांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बापट यांनी राष्ट्रवादी हा छुपा जातीयवादी पक्ष असल्याचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर जगताप आणि पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत बापट यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
जेम्स लेन प्रकरणी भांडारकर संस्थेबाबत आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याबाबत भाजपच्या भूमिका बापटांना मान्य आहेत का? मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांवर गुन्हे ही भाजपची चूक होती का? भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा समाजाचे मोर्चे स्टंटबाजी असल्याचे वक्तव्य केले होते; ते बापट यांना मान्य आहे का? शिरोळेंना मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून भाजपने उमेदवारी नाकारली का? या प्रश्नांची उत्तरे बापट यांनी मतदानापूर्वी द्यावी, अन्यथा दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही जगताप यांनी केली. कोंडदेव प्रकरणात पोलिस भाजप नगरसेवकांना 'ना हरकत' प्रमाणपत्र देतात; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नाकारतात, तसेच महापालिकेची शिवसृष्टी सोडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला सरकारतर्फे निधी दिला जातो, शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी जंगली महाराज रस्ता देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली जात नाही, याबाबतही बापटांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिंदे यांनी केली.
...
पाणी, तूरडाळ आणि बापट
धरणक्षेत्रात भरपूर पाऊस पडल्यावरही कोणतेही नियोजन न करता कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे दर गुरुवारी पुणेकरांना अघोषित पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. आता दोन-तीन दिवसांआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला पालकमंत्री गिरीश बापट यांचा नियोजनशून्य कारभारच कारणीभूत असल्याची टीका शिंदे यांनी केली. ऐन पावसाळ्यात धरणातून सुमारे २० टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडले गेले. सध्या धरण क्षेत्रात केवळ आठ टीएमसी पाणी असून ग्रामीण भाग, शेतीसाठी आवर्तन आणि बाष्पीभवनाचा हिशोब पाहता पुणेकरांना १५ जुलैपर्यंत अवघे २.९९ टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे कालवा समितीचे अध्यक्ष असलेले बापट यांनी पाच वर्षांत पुणेकरांच्या पाण्याचा खेळखंडोबा केला असून पाणी, तूरडाळ आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुणेरी संस्कृतीचे नियोजन त्यांना जमले नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.