पुणे : 'रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या नीरोचे दुसरे रूप पुण्यात दिसत आहे. हेल्मेटसक्तीमुळे पुणेकर त्रस्त झाले असतानाही पालकमंत्री गिरीश बापट डोळे मिटून बसले आहेत,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केली.
'पुणे हे आधी टांग्याचे, नंतर सायकलींचे आणि आता स्वयंचलित २५ लाख दुचाकींचे महानगर बनले आहे. सरकारने अचानक पुणेकरांवर हेल्मेटसक्तीचा वरवंटा फिरवला असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सक्ती करण्याआधी कोणतेही प्रबोधन, प्रचार आणि प्रसार न करता पोलिसांकडून दुचाकीस्वारांची पिळवणूक करण्यात येत आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असताना बापट मात्र, डोळे मिटून पुणेकरांचे हाल पाहत होते,' असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शहरात अरुंद रस्ते असून, येथील वाहतूक अत्यंत धिम्या गतीने म्हणजे ताशी १० किलोमीटर प्रती वेगाने चालते. शहराबाहेर राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेटसक्ती करणे गरजेची आहे. मात्र, सध्या ही सक्ती शहराच्या मध्यभागात करण्यात येत आहे. सध्या हेल्मेटमुळे डोके वाचविण्याऐवजी डोकेदुखी वाढली आहे. तीन लाख पुणेकरांना दंड ठोठावण्यात आला आहे. या निवडणुकीत बापट यांना घरी बसविण्याची संधी आली आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी संसदेत गेल्यानंतर हेल्मेटसक्तीचा कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.