म. टा. प्रतिनिधी, येरवडा
जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या तीन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी बुधवारी पहाटे लोणावळ्यातून अटक केली. यापूर्वी या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे तरुणाच्या खुनातील सर्व सहा आरोपींना अटक झाली आहे. कोर्टाने या आरोपींना १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नकुल उर्फ ऋषिकेश हनुमंत झेंडे (वय २०), सुमित सुनील आयगुळे (वय २०) आणि ओंकार राजेंद्र चव्हाण (वय २०, रा. सर्व्हे नं. ११०/१११, शांतीनगर, येरवडा) अशी लोणावळ्यातून अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. आनंद उर्फ स्नेहजीत नामदेव पंचमुख (वय ३२), धनंजय किसन लोंढे (वय २३) आणि ऋत्विक साहेबराव निकम (वय २०, सर्व रा. शांतीनगर) या तिघांना विश्रांतवाडी पोलिसांनी मंगळवारीच अटक केली होती. या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.
विवेक बाळासाहेब पंचमुख (वय २९, रा. आशीर्वाद बंगला, जनार्दननगर, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विवेकचा भाऊ सुमित पंचमुख (वय २५) याने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आनंद पंचमुख आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी येथील जुना आळंदी रस्त्यावर रविवारी (८ डिसेंबर) रात्री विवेक पंचमुख लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार करून, तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटल्यावर सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. आरोपींचा गट शिर्डीत, तर दुसरा पिंपरीला पळाला होता. पोलिस मागावर असल्याचे समजताच आरोपी ठिकाण बदलत होते. आनंद पंचमुख, धनंजय लोंढे आणि ऋत्विक निकम नाशिक फाट्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. यादरम्यान उर्वरित तीन आरोपी लोणावळ्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बुधवारी पहाटे इतर तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम, सहायक निरीक्षक रणजीत मोहिते, कर्मचारी विजय सावंत, दिनकर लोखंडे, विनायक रामाने, सोमनाथ खलसोडे, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे, किशोर दुशिंग, संदीप देवकाते आणि अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.