राज्यात ११३ साखर कारखान्यांत गाळप सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात गळीत हंगामाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ११३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांपैकी ३८ कारखान्यांनी शंभर टक्के रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) शेतकऱ्यांना दिली आहे. सुमारे ६० टक्के शेतकऱ्यांना एक हजार ३७ कोटी रुपयांच्या 'एफआरपी'चे वाटप झाले आहे.
राज्यात ऊस गळीत हंगामाला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. अर्ज केलेल्या १६३ साखर कारखान्यांपैकी १४६ कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी ११३ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक हजार ७७१ कोटी ८२ लाख रुपयांची 'एफआरपी' देणे आहे. त्यातील एक हजार ३७ कोटी १३ लाख रुपयांची 'एफआरपी' देण्यात आली असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
गळीत हंगाम सुरू झालेल्या ११३ कारखान्यांपैकी ३८ कारखान्यांनी शंभर टक्के 'एफआरपी' दिली आहे. ८० ते ९९ टक्के 'एफआरपी' दिलेले पाच कारखाने आहेत. ६० ते ७९ टक्के 'एफआरपी' सात कारखान्यांनी दिली आहे. शून्य ते ५९ टक्के 'एफआरपी' दिलेले २६ कारखाने असल्याचे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना 'एफआरपी' न देणाऱ्या ९३ कारखान्यांना महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित कारखान्यांनी 'एफआरपी' दिल्याने थकीत 'एफआरपी'चे प्रमाण कमी झाले आहे. अवघ्या दोन कारखान्यांकडे सुमारे ४५२ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्या कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यांच्याविरूद्ध मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.