म. टा. प्रतिनिधी, पुणे
'विशिष्ट जात-धर्म वाईट आहे, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, हा 'पद्धतशीर' प्रचाराचा भाग आहे. हा पूर्वग्रह, आकस जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच समाज सुखी होईल,' असे मत मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केले. 'देशात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या संघटना हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत, त्यांचा निषेधच केला पाहिजे,' असेही त्यांनी ठणकावले.
बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी झालेल्या एस. एम. मुश्रीफ लिखित 'ब्राह्मनिस्ट्स बॉम्ब्ड्, मुस्लिम्स हँग्ड' (ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले) पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर आंबेडकर या वेळी उपस्थित होते.
'एस. एम. मुश्रीफ यांच्यासारखी पोलिस महानिरीक्षक दर्जाची व्यक्ती आपल्या पुस्तकात जे मुद्दे मांडते, त्याबाबत चर्चा, विश्लेषण आणि खंडन झाले पाहिजे,' असे प्रारंभी नमूद करून ठिपसे म्हणाले, 'वैफल्यातून विशिष्ट समाजाला जबाबदार धरले जाते. एखादा समाज वाईट असल्याचा आकस निर्माण होतो. हा 'राँग नंबर' बाहेर काढला पाहिजे; तसेच तपास यंत्रणा, न्यायदानाच्या यंत्रणा संवेदनशील असल्या पाहिजेत.'
'खऱ्या देशभक्ताची एकनिष्ठता घटनेच्या तत्त्वांमध्ये आहे. ज्याचा स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर विश्वास नाही, तो खरा देशभक्त असू शकत नाही,' अशा शब्दांत रत्नाकर गायकवाड यांनी देशभक्तीची व्याख्या केली. या पुस्तकाचा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 'समाजात जातीयवाद वाढत आहे. या जातीयवादाच्या भिंती तोडण्याची आवश्यकता आहे,' असे सुधाकर आंबेडकर म्हणाले.
मुश्रीफ यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली. 'अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांचा फेरतपास झालेला नाही. ते पडताळण्याचा प्रयत्न केला असता अनेक प्रकरणांमध्ये संशयाची सुई ब्राह्मण्यवादी व्यक्ती आणि संघटनांकडे असताना पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि निरपराध मुस्लिम युवकांना अटक करून खटले चालविल्याचे दिसून आले,' असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
...
'रामराज्याच्या नावाखाली दहशत कशी?'
'अनेक संघटना हिंदू राष्ट्र निर्मितीबाबत बोलतात. मग उतरंडीवर आधारित समाज निर्माण करायचा आहे का, रामराज्यात अगदी रामावरही टीका करण्याचा अधिकार होता. मग रामराज्याच्या नावाखाली दहशत कशी निर्माण करू शकता,' असे परखड सवालही अभय ठिपसे यांनी केले.
....
दोघांना घेतले ताब्यात
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी ब्राह्मण संघटनांकडून केली जात होती. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. कार्यक्रमाच्या प्रारंभीच पोलिसांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना ताब्यात घेतले. या वेळी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा घोषणा देत त्यांनी पुस्तकाचा आणि लेखकाचा निषेध केला.