म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुणे ते सातारा आणि कोल्हापूर नजिक मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत सातारा महामार्गावर टोल वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरी संघटनांकडून केली जात आहे.
जुलैच्या अखेरपासून पुणे शहर, जिल्ह्यासह पुणे-सातारा महामार्गालगतच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटही मोठ्या प्रमाणावर वाहत होते. तसेच, साचून राहिलेले पाणी आणि वाहून आलेला राडारोडा यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पुणे ते सातारा दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे साताऱ्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना वाहन चालविताना, विशेषत: रात्रीच्या वेळेला अधिक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने वेळू, नसरापूर, सारोळा, खंडाळा, शिरवळ, आणेवाडी टोलनाका आणि सातारा शहराच्या अलीकडील काही भागात खड्डे आहेत. तसेच, कोल्हापूर परिसरात महामार्गावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे काही ठिकाणी रस्ताच वाहून गेल्याचे दिसून येत आहे. तर, खड्डेदेखील पडलेले आहेत.
परिणामी, या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास गैरसोयींचा ठरत आहेत. असे असतानाही प्रवाशांना पुणे ते साताऱ्या दरम्यान खेड शिवापूर, आणेवाडी आणि सातारा ते कोल्हापूर यामध्ये किणी आणि तासवडे या ठिकाणी टोल द्यावा लागतो. पुण्याहून जाणाऱ्यांना साताऱ्यापर्यंत एका बाजूचा १६० रुपये टोल द्यावा लागतो. तर, सातारा ते कोल्हापूर या दरम्यान १५० रुपये टोल द्यावा लागतो. म्हणजेच पुणे-कोल्हापूर प्रवासासाठी एकूण ३१० रुपये टोलसाठी खर्च होतात. एवढे पैसे खर्च करणाऱ्या प्रवाशांना सध्या त्यातुलनेत मिळणारी रस्ते सेवा अत्यंत वाइट आहे, असे सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.
...
पर्यटनाला फटका
साताऱ्यात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार, ठोसेघर, सज्जनगड, लिंब गोवे आदी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. संपूर्ण राज्यातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या पर्यटकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे.
...
टोल देणाऱ्या नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, टोल आकारणी करणाऱ्यांचे कर्तव्य आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर हा रस्ता चांगला होत नाही, तोपर्यंत टोल आकारणी करू नये.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरी मंच