म. टा. प्रतिनिधी, पुणे
'निरोगी आयुष्य जगण्यासाठी पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. यासाठी सरकारने शंभर कोटींचा निधीही मान्य केला आहे. नवीन योजना आणि उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. यापुढे शाश्वत पर्यटनाची कास धरावी लागणार आहे,' असे मत राज्य पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने नुकताच एक राष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. या परिषदेत ठाकरे यांच्यांशी फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी संवाद साधला. या वेळी फिक्की फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन, वर्षा चोरडिया, भाग्यश्री पाटील तसेच राज्यातील विविध भागांतील सदस्य सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले, 'करोनाचे संकट दूर झाल्यानंतरही पर्यावरण आणि पर्यटन शाश्वत राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पर्यटनातून अनेकांना रोजगार मिळतो. राज्यातील गड, किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र, पठारे, संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्नशील आहोत.'
जानबी पूखन म्हणाल्या, 'फॅन्सी रचनांपेक्षा अस्सल आनंद देणारी, जगण्यायोग्य, शाश्वत जीवनमान असणारी पर्यटनस्थळे असण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षित करून त्यांना राज्य पर्यटनात सहभागी करून घेण्याचा आम्ही काम करणार आहोत.'