म. टा. प्रतिनिधी, पुणे
माहेरी आणि सासरी असलेले वारकरी संप्रदायाचे वातावरण... दोन्हीकडे शिक्षणासाठी मिळालेले प्रोत्साहन या दोन्हीच्या जोरावर एका शिक्षिकेने चक्क निवृत्तीनंतर पीएचडी पदवीही संपादन केली आहे. असह्य गुडघेदुखी सहन करून, केवळ जिद्दीच्या जोरावर तीन वर्षे अथक अभ्यास करून, त्यांनी हे यश मिळवले आहे.
वयाच्या ६७व्या वर्षी सुलभा शिवाजीराव मोहिते यांनी हे यश मिळवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखे अंतर्गत ज्येष्ठ नागरिक गटातून मराठीतून त्यांनी 'मराठीतील संत कवयित्रींच्या अभंगातील संवादतत्त्व' या विषयावर प्रबंध सादर केला. नगरमधील अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके यांनी त्यांना मार्गदर्शन केले. विविध सामाजिक उपक्रमातही त्या सक्रिय होत्या; तसेच १५ वर्षे त्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारीही केली आहे.
आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय, जनता शिक्षण संस्थेच्या दापोडी व औंध माध्यमिक विद्यालयात ३६ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केल्यानंतर २०१० मध्ये सुलभा निवृत्त झाल्या. पती शिवाजीराव यांच्यासह कुटुंबीयांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर २०१५ मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी नोंदणी केली. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉरिशस, मॉस्को, दुबई इत्यादी ठिकाणी शोधनिबंध सादर केले.
'महाराष्ट्रातील संत कवयित्रींच्या अभंगातील संवादतत्त्वांचा अभ्यास झालेला नाही, असे माझ्या लक्षात आले. या संतांच्या काळात महिलांवर बंधने होती, समाज जातीपातीत विभागला होता. त्यावर त्यांनी केलेल्या भाष्याचा अभ्यास करण्यासाठी मी हा विषय निवडला. यातील बहुसंख्य संत कवयित्रींच्या मूळ गावी जाऊन, राज्यातील सर्व महत्त्वाच्या ग्रंथालयांत जाऊन मी पुस्तके, बाडे तपासली. त्यांच्या वंशजांशी, अभ्यासकांशी चर्चा केली. त्यातून हा प्रबंध आकाराला आला,' असे सुलभा मोहिते म्हणाल्या.
माझे दोन्ही गुडघे प्रचंड दुखत असल्याने डॉक्टरांनी गुडघेबदलाची शस्रक्रिया करण्यास सांगितले होते. त्यामुळे पहिल्या दोन-अडीच वर्षात मी प्रचंड वाचन करून, विविध ठिकाणी भेट देऊन, संदर्भसाहित्य गोळा केले. त्यावर अभ्यास करून संशोधन प्रबंध तयार केला. सहा महिन्यांपूर्वी माझा प्रबंध सादर झाल्यानंतरच मी दोन्ही गुडघ्यांची शस्रक्रिया करवून घेतली.
- सुलभा मोहिते