म. टा. प्रतिनिधी, पिंपरी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने थेरगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थ्यांने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (२५ मे) दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव येथील बोऱ्हाडेनगर येथे ही घटना घडली. संजय दत्तात्रय विभूते असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांने बहिस्थ विद्यार्थी (एक्स्टर्नल) म्हणून यंदा बारावीची परीक्षा दिली होती. मागील वर्षी तो दोन विषयांत नापास झाला होता. यंदा त्याचा निकाल नक्की काय लागला, हे त्याच्या कुटुंबीयांना सध्या सांगता येत नाही. कारण यंदा परीक्षा दिल्यावर संजयने त्याचे हॉल तिकिट घरात कोणालाही दाखविले नव्हते. तो यंदादेखील नापास झाल्यानेच त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर तो घराच्या बाहेर पडला नाही. संजयचे आई-वडील घरात खालच्या रुममध्ये होते; तर संजय वरच्या रुममध्ये बसला होता. दुपारी संजयने रुममध्ये साडीच्या साहाय्याने लोखंडी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. या प्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत.
नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने थेरगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थ्यांने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (२५ मे) दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव येथील बोऱ्हाडेनगर येथे ही घटना घडली.
Maharashtra Times 26 May 2016, 3:00 am