म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांचा सज्जनगड स्वच्छ, सुंदर, सुशोभित व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकमुक्त व्हावा, यासाठी सज्जनगड-सुंदरगड अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून समर्थभक्त, शिवप्रेमी, गडप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी; तसेच गडावरील स्थानिक रहिवासी, दुकानदारांनी पुढाकार घेतला आहे.
दरमहा राबवल्या जाणाऱ्या या अभियानातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक संकलन केले जात असून, भाविकांनाही गडावर प्लास्टिक न आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सातारा येथील श्री क्षेत्र सज्जनगड येथे श्रीरामदासस्वामी संस्थान आणि पर्यावरणप्रेमी समर्थभक्तांनी मिळून, १६ जुलै २०१९ रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर 'सज्जनगड-सुंदरगड' या कायमस्वरूपी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात १३ ऑक्टोबर २०१९ रोजी कोजागिरी पौर्णिमेला झाली.
अभियानात २५ हून अधिक पोती प्लास्टिक गोळा करण्यात आले. यात १०० ते १२५ सेवेकरी सहभागी झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एकदा, डिसेंबरमध्ये दोन वेळा, जानेवारी महिन्यात दोन वेळा आणि नुकतेच १४ फेब्रुवारीलाही हे अभियान राबवण्यात आले.
'अशा परिस्थितीत सज्जनगडावर येणाऱ्या समर्थभक्तांना सर्व सेवा उत्तम प्रकारे पुरवता याव्यात; तसेच येथील सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व जपले जावे, पर्यावरणजागृती व्हावी, सज्जनगडावर सुशोभीकरण व्हावे, स्वच्छता राहावी या हेतूने हे अभियान आयोजिण्यात आले आहे. श्रीरामदासस्वामी संस्थानासह पर्यावरणप्रेमी, स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि समर्थभक्तांच्या श्रमदान आणि योगदानातून सध्या हे अभियान सुरू आहे,' असे संस्थानाचे अध्यक्ष सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी सांगितले.
श्रीरामदासस्वामी संस्थान गेली ३५० वर्षांपासून सज्जनगडाचा कारभार अव्याहत सांभाळत आहे. निवास, भोजनप्रसाद, गोशाळा, वेदपाठशाळा, जीर्णोद्धार इत्यादी कार्ये नियमित सुरू आहेत. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढत आहे. त्याचा ताण येथील संपूर्ण व्यवस्थेवरही येत आहे.
- बाळासाहेब स्वामी, अध्यक्ष, श्रीरामदासस्वामी संस्थान
भक्तांना आवाहन
सज्जनगडावर येणाऱ्या सर्व भक्तांनी गडावर कुठेही प्लास्टिक कचरा व अस्वच्छता होणार नाही, याविषयी जागरुक राहून, सज्जनगडाचे आध्यात्मिक पावित्र्य सांभाळावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३९१८४०८, ९४२३०३२११६ या क्रमांकावर संपर्क साधावा.