म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील रामकृष्ण मठाचे पहिले अध्यक्ष स्वामी भौमानंदजी महाराज यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ता साधू हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुण्यात १९८४मध्ये रामकृष्ण मठाची स्थापना झाली. तेव्हापासून २०१०पर्यंत स्वामी भौमानंद मठाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी दैनंदिन कामातून निवृत्ती स्वीकारली. हृदयविकारावरील उपचारासाठी त्यांना चार जानेवारी रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी दोन ते साडेसहा या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मठामध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यासह आसपासच्या भागातील अनेक भक्तांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.ॉ