म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भवानी पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यतिथी आणि श्री स्वामी समर्थ मंदिराचा २४वा वर्धापनदिन यानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ७ मे या कालावधीत महोत्सवात विविध सांस्कृतिक; तसेच धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुका दर्शनासाठी मंदिरात उत्सवकाळात ठेवण्यात येणार आहेत,' अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन २ मे रोजी सायंकाळी सहा वाजता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नेते उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. या प्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, नगरसेवक आबा बागुल, अजित आपटे, माजी महापौर अंकुश काकडे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर स्वरश्री प्रस्तुत स्पतसुरांचा आविष्कार 'गीतगुंजन' हा कार्यक्रम होणार आहे. पुण्याच्या लौकिकात भर घातल्याबद्दल विद्याधर अनास्कर, डॉ. सुरेश पाटणकर, सुरेश कोते, डॉ. विकास अबनावे, डॉ. अभिजित सोनवणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
३ तारखेला 'कलारंजना' निर्मित 'माय मराठी', ४ मे रोजी 'मेरे देश की धरती', ५ तारखेला अष्टविनायक निर्मित 'आमच्या 'ही'चं प्रकरण' हे नाटक, ६ तारखेला पार्श्व निर्मित व संदीप पंचवाटकर प्रस्तुत 'सजदा', ७ तारखेला थर्ड बेल प्रस्तुत 'रंग जल्लोष' असे कार्यक्रम होणार आहेत. उत्सव काळात रोज सकाळी ६ ते ९ या वेळेत महापूजा होणार आहे. या काळात दिवसभर भजन महोत्सव रंगणार आहे.
वर्धापनदिन कार्यक्रम अक्षयतृतीयेला साजरा होणार आहे. या दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा असेल. ९ तारखेला दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बालउद्यान, भवानी पेठ येथे होणार आहेत. धार्मिक कार्यक्रम गणेश कुलकर्णी, श्रीपाद देशपांडे, सोमनाथ तिवारी यांच्या हस्ते होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विपिन गुपचूप यांनी केले आहे.