म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शेषन यांचे व्यक्तिमत्त्व प्रामाणिकपणाचे प्रतीक होते. त्यामुळेच कदाचित त्यांच्याबरोबर काम करणे हे अनेकांसाठी अत्यंत कठीण होते. आपल्या देशाला शेषन यांच्यासारख्या अनेक लोकांची आवश्यकता आहे,' अशा शब्दांत गृहविभागाचे माजी सचिव माधव गोडबोले यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना आदरांजली वाहिली.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि एमआयटी-डब्ल्यूपीयू यांच्या वतीने स्व. टी. एन. शेषन यांच्या शोकसभेचे आयोजन सिम्बायोसिस विश्वभवन येथे करण्यात आले होते. गोडबोले सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
गोडबोले म्हणाले, की शेषन यांनी भारतीय निवडणूक आयोगाची स्थिती आणि दृश्यमानता पुन्हा परिभाषित केली. निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटी त्यांनी दूर केल्या; तसेच गैरप्रकारांना आळा घातला. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचे मोलाचे योगदान शेषन यांनी दिल्याचे गोडबोले यांनी सांगितले. डॉ. मुजुमदार आणि डॉ. कराड यांनी शिक्षणसंस्थांशी भावनिकदृष्ट्या कसे जोडले आहेत, याची माहिती देऊन, वैयक्तिक अनुभवांचे कथन केले.
डॉ. मुजुमदार म्हणाले, 'शेषन यांचे व्यक्तिमत्त्व बाहेरून आक्रमक दिसत असले, तरी ते मनाने अत्यंत सौम्य होते. शेषन यांचा जन्म इतिहास घडवण्यासाठीच झाला होता आणि त्यांनी तो घडवला.' सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनीही भाषणातून आदरांजली वाहिली. प्रा. राहुल कराड यांनी अनुभव यांगितले. प्रा. कराड भाषणाच्या वेळी खूप भावूक झाले होते. डॉ. कराड एमआयटी-एसओजीच्या निर्मितीच्या वेळी शेषन यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि इतर आठवणींना उजाळा दिला.
'शेषन यांच्या नावाची संस्था सुरू करणार'
'राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या व्यक्तींप्रमाणेच भारतीय लोकशाहीचा इतिहास टी. एन. शेषन यांना कधीच विसरू शकणार नाही,' असे मत डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले. एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन टी. एन. शेषन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेषन एक कुशल, कर्तबगार प्रशासक व निष्ठावान व्यक्ती होते. लोकशाहीत प्रशासकाची भूमिका किती महत्त्वाची असते आणि ते काय करू शकतात हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखविले, असे डॉ. कराड यांनी सांगितले. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून एमआयटी संस्थेतर्फे भविष्यात चेन्नई येथे 'टी. एन. शेषन नारायणी' या नावाने लोकशाही, व्यवस्थापनशास्त्र किंवा प्रशासन यांसारखी संस्था सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रा. राहुल कराड यांनी सांगितले. डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. एस. एम. पठाण, पंडित वसंतराव गाडगीळ, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. सुनील राय, प्रा. डी. पी. आपटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.