म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'प्रतिभा ही कुठल्या राजवाड्यात जन्म घेत नाही किंवा लेखनासाठी घरची आर्थिक परिस्थितीही आड येत नाही. मुलामुलींचा त्या त्या वयात सन्मान झाला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांमधून उत्तम लेखक, कवी घडतील,' अशी आशा ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिल्या 'शब्दधन जीवन गौरव' या राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले. या वेळी विश्वास पाटील बालकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण पवार, संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे, शब्दधन जीवन गौरव काव्यमंचाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, सहायक शिक्षण संचालक अशोक पानसरे, 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, बाल साहित्यिक सानिका भालेराव आदी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, की विद्यार्थी जीवनात उत्तमोत्तम लेखकांच्या पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. उत्तम वाचन केल्याशिवाय लेखनाला बळ मिळणार नाही. वाचलेले स्मरणात ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. तुम्ही उत्तम वाचल्याशिवाय तुम्ही लेखक, कवी होऊ शकणार नाही. गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. तुकोबा, ज्ञानोबांची भाषा खेड्यापाड्यात जपली जात आहे.
बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे आणि शब्दधन जीवन गौरव विशेषांकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. संमेलनासाठी राज्यभरातून २५०हून अधिक पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर शिंदे, राहुल इंगळे, प्रशांत शेळके, सोमनाथ वाघ, उमेश कुंदे यांनी केले.
बालकुमार साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.