अ‍ॅपशहर

बी. जयश्री यांना तन्वीर सन्मान

अभिनय, गायन व दिग्दर्शन अशा कला मुशाफिरीतून कन्नड रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी खासदार बी. जयश्री यांना तन्वीर सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सतत संघर्षाच्या भूमिकेसाठी तयार असणारे आघाडीचे प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांचा नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू व दीपा श्रीराम यांच्या मुलाच्या, तन्वीरच्या स्मरणार्थ रूपवेध प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात.

Maharashtra Times 30 Nov 2018, 2:31 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanveer samman announced to kannada actress singer b jayashree
बी. जयश्री यांना तन्वीर सन्मान


अभिनय, गायन व दिग्दर्शन अशा कला मुशाफिरीतून कन्नड रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी खासदार बी. जयश्री यांना तन्वीर सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सतत संघर्षाच्या भूमिकेसाठी तयार असणारे आघाडीचे प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांचा नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू व दीपा श्रीराम यांच्या मुलाच्या, तन्वीरच्या स्मरणार्थ रूपवेध प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात.

तन्वीर सन्मानचे स्वरूप एक लाख रुपये, तर नाट्यधर्मी पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रुपये असे आहे. तन्वीर याचे अपघाती निधन झाल्यापासून गेली १५ वर्षे पुरस्कारांची ही मालिका सुरू आहे. 'तन्वीर' या फारसी शब्दाचा अर्थ 'आकाशातील दिव्य प्रकाश' असा आहे. या प्रकाशाचे धनी सन्मानाचे मानकरी होतील, अशी लागू दाम्पत्याची भावना आहे.

'तन्वीरच्या जन्मदिनी ९ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. बी. जयश्री यांची मुलाखत ज्योती सुभाष घेणार आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील या दोन मैत्रिणींचे संवादरूपी चिंतन उपस्थितांना अनुभवता येईल. 'सत्यशोधक' नाटकात महात्मा फुलेंची भूमिका करणारा ओंकार गोवर्धन अतुल पेठे यांच्याबद्दल बोलणार आहे. अतुल पेठे आणि मोहन आगाशे यांचीही भाषणे या वेळी होतील. बी. जयश्री यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या नाटकातले काही प्रसंग दाखविण्यात येणार आहेत; तसेच त्या स्वत: काही सादरीकरण करणार आहेत,' असे दीपा श्रीराम व गौरी लागू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

बी. जयश्री यांच्याविषयी...

बी. जयश्री यांनी प्रदीर्घ कारकिर्दीत कन्नड रंगभूमीवर अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत; तसेच अनेक नाटकांतून अभिनय केला आहे. साठहून अधिक नाटके 'स्पंदना' या आपल्या संस्थेद्वारे त्यांनी रंगभूमीवर आणली. या नाटकांचे देशविदेशात कौतुक झाले आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय, श्रीराम सेंटर, भरतेंदु अकादमी या देशातील ख्यातनाम संस्थांसाठी त्यांनी काही नाटके दिग्दर्शित केली आहेत. कन्नड सिनेमांमधून त्यांनी पार्श्वगायन केले आहे. बी. जयश्री यांची शैली लोकसाहित्यातून व कर्नाटकातील लोकनाट्य परंपरेतून घडली आहे. आजोबा गुब्बी विरण्णा यांची परंपरा प्रवाही ठेवण्याचे काम बी. जयश्री यांनी केले आहे. पद्मश्री व संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत.

दर वर्षी केवळ व्यक्तींना पुरस्कार न देता नाटक परंपरेला पुढे नेणाऱ्या आघाडीच्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यात येईल. रंगभूमीसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या मंडळींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्थेचा हेतू आहे. आजची रंगभूमी कुणाच्या खांद्यावर उभी आहे, यावर प्रकाशझोत टाकणे आणि नवीन रंगकर्मींना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

- दीपा श्रीराम, ज्येष्ठ अभिनेत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज