म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशात उच्च तंत्रज्ञानचा प्रभावीपणे वापर व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याबाबातची दोन्ही प्रथम क्रमांकाची पारितोषिक महाराष्ट्र पोलिस दलास जाहीर झाली आहेत. नवी दिल्ली येथील अखिल भारतीय पोलिस प्रमुख संवाद संमेलनात केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते बिनतारी संदेश विभागचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांनी ही पारितेषिक स्वीकारली.
डिजिटल दळणवळण प्रणाली, उपग्रह आधारित दळणवळण यंत्रणा आणि डिजिटल रेडिओ ट्रॅकिंग प्रणाली अशा सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा यशस्वीपणे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. अत्याधुनिक उपग्रह दळणवळण यंत्रणा, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम असे उपक्रम प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्र पोलिस दलास मिळालेले पुरस्काराचे श्रेय हे बिनतारी संदेश विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे असल्याचे ही रितेश कुमार यांनी सांगितले.