म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोट आणि उरी हल्ल्याचे राजकारण करत असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले वाढल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शनिवारी केला. 'पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेले आरडीएक्स देशात आलेच कसे,' असा सवालही त्यांनी केला.
शहर काँग्रेस व लोकायत संघटनेतर्फे टिळक वाड्यात 'मोदी सरकारची पाच वर्षे' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी 'लोकायत'चे नीरज जैन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते वसंत मोरे, किशोर शिंदे, 'इंटक'चे सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे आणि खोट्या आकडेवारीने देशाची अर्थव्यवस्था मातीत गेली आहे. विविध प्रश्नांचा गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे मोदींना पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तत्पूर्वी, नीरज जैन यांनी मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या आर्थिक कामगिरीचे विश्लेषण मांडले. भाजपला लोकशाही, समानता व धर्मनिरपेक्षता नको असून सत्तेच्या माध्यमातून संघाचा अजेंडा राबविला जात आहे. जाती-धर्मांत जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केली जात आहे. दुसरीकडे विकासदर सातत्याने घटत असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे पाच वर्षांत भाजपने देशाची दुरवस्था केल्याचा आरोपही त्यांनी केला.
.......