म. टा. प्रतिनिधी, पुणे
'एखादा पक्ष मूळ वाट विसरतो, तेव्हा त्या पक्षातील चांगली माणसे दुसऱ्या पक्षात येतात,' अशा शब्दांत भाजपमध्ये आलेल्या 'आयारामां'चे समर्थन करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांकडे 'नेतृत्वाची दिवाळखोरी' असल्याची टीका केली. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची घराणेशाही म्हणजे एकाच परिवारातील व्यक्ती पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात, मात्र, भाजपमध्ये तसे होत नाही,' असा दावाही त्यांनी केला.
शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार गिरीश बापट यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
'वैचारिक दिवाळखोरी, घराणेशाही, वोटबँकेचे राजकारण आणि राष्ट्रविरोधी घटकांना साथ देण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली असून, 'राष्ट्रवादी'चे अवसान संपत चालले आहे, तर मोजक्या जागा लढविणारे मुख्य विरोधी पक्ष करा, असे म्हणत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर महायुती राज्यात २२१ पेक्षा जास्त जागा मिळवून काँग्रेसचा विक्रम मोडेल,' असा विश्वासही जावडेकरांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या 'आर्थिक दिवाळखोरी'चा आरोपाविषयी बोलताना, 'जगात मंदीचे वातावरण असल्याने, भारतात मंदी आहे. केंद्र सरकार रोज संवेदनशीलतेने निर्णय घेत असून, अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येईल, असेही ते म्हणाले.
.
पूरव्यवस्थापन गरजेचे
परिषदेच्या प्रारंभी सुमारे अकरा मिनिटांचे प्रास्ताविक करताना पर्यावरणमंत्र्यांनी राममंदिर, एनआरसी, जीएसटी, देशविरोधी नारे, तिहेरी तलाक विधेयक, काश्मीर आदी मुद्द्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर शहरात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि झाडपडीच्या घटनांच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पर्यावरणमंत्र्यांनी पावसाच्या पाण्याचा निसर्गत: निचरा करणारे मार्ग भरून गेल्याने पाणी नदीपर्यंत पोहोचत नसल्याची कबुली दिली. 'सर्वच शहरांमध्ये नदीपात्रात वसाहती झाल्या असून, पुराचा त्रास वाढतो आहे. त्यामुळे हा नगरनियोजनाचा विषय असून, राज्य सरकारने पूर व्यवस्थापन करावे' असे मतही त्यांनी व्यक्त केले.