म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारपदरी रस्त्यावरून सुसाट जाणारी वाहने, अचानक येणारा एकेरी रस्ता, अनपेक्षित व अंदाज न लावता येणारी वळणे आणि रस्ता दुभाजकांचा अभाव अशी सध्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची अवस्था आहे. रात्री या रस्त्याने जाताना बहुतांशी ठिकाणी 'ब्लॅक स्पॉट' असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अपघातही होत आहेत. परिणामी, पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे असून, त्यापूर्वी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून, त्याचे काम येत्या काळात सुरू होणे अपेक्षित आहे. या पालखी मार्गाचे डिझाइन तयार करण्यात आले असून, त्यास मान्यताही मिळाली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग आळंदीऐवजी पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला मोशी ते मोहोळ असा जोडणार आहे, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग देहू ते सोलापूर जिल्ह्यातील तोंडले-बोंडलेपर्यंत असेल. तोंडले-बोंडले येथे तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील भूसंपादन केले जाईल. मात्र, यात प्रामुख्याने भूसंपादनाचा प्रश्न भेडसावत असून, तो सोडविण्यासाठी यंत्रणांचे युद्धपातळीवरील काम गरजेचे आहे. हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असतानाही अनेक ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आजही तेथे रस्ता अरूंदच राहिला आहे. ती ठिकाणे सध्या अपघाताचे क्षेत्र ठरत आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग हा मोशी ते मोहोळ हा रस्ता २६९ किलोमीटरचा असेल. पुणे जिल्ह्यातील ९३, सातारा जिल्ह्यातील ६९ आणि सोलापूर जिल्ह्यातील ११७ किलोमीटरचा रस्ता असेल. यात दिवे घाटात एक स्वतंत्र रस्ता करण्यात येणार आहे; तसेच पंढरपूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद-नीरा, जेजुरी आणि सासवड या ठिकाणी बायपास करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी भेकराईनगर ते फुरसुंगी या दरम्यान भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर उर्वरित ठिकाणी रस्त्यासाठी हव्या असलेल्या जागेची संयुक्त मोजणी केली जात आहे. ही मोजणी एप्रिल महिन्यात पूर्ण होऊन पुढील प्रक्रिया वेगाने करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या मोजणीत त्रुटी राहू नयेत, यासाठीची अचूक मोजणी 'ड्रोन'चा वापर करून केली जाणार आहे.
पुरंदर तालुक्यात दोन वर्षांत ३० बळी
पालखी मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये गेल्या दोन वर्षांत एकूण ३० जणांना प्राण गमवावा लागला आहे. हा मृतांचा आकडा केवळ पुरंदर तालुक्याच्या हद्दीतील आहे. पुरंदर तालुक्यात या मार्गावर २०१६ साली एकूण २० अपघातांची नोंद आहे. त्यात २१ जण जखमी झाले, तर आठ मृत झाले. २०१७ या वर्षात २१ अपघातात १५ जखमी व १८ मृत आणि २०१८ या वर्षात आतापर्यंत चार अपघातात सहा जखमी व चार मृत आहेत.