म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शहरातील तज्ज्ञांनी बनविलेला अभ्यासक्रम आदिवासी भागातील मुलांशी जुळत नाही. दररोजचे आयुष्य जगताना मिळणाऱ्या अनुभवातील ज्ञानाचा अभ्यासक्रम कुठे नसतो. त्यामुळे हे शिक्षण आमच्यासाठी कंटाळवाणे आहे,' असे परखड मत नंदुरबार जिल्ह्यात एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या रूषा वळवी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
महर्षी कर्वे स्त्री -शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी वळवी यांना बाया कर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी, संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, कार्याध्यक्ष प्रमोद गोऱ्हे, उपकार्याध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, सचिव पी.व्ही. एस. शास्त्री, समिती सदस्य विद्या देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, माधुरी नागरस आदी उपस्थित होते.
वळवी म्हणाल्या, 'नर्मदा खोऱ्यातील आदिवासी भागात आजही शिक्षण देणे, आरोग्याच्या सुविधा पुरविणे, विकास करणे कठीण आहे. मला स्वत:ला शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या. शहरात बनविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने हे शिक्षण कंटाळवाणे वाटते. यामध्ये स्थानिक भागातील संस्कृतीचाही समावेश असायला हवा. अभ्यासक्रमात आम्ही मागे असू; पण परंपरागत ज्ञान मौखिक पद्धतीने सांभाळून ठेवले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथील प्रश्न समजून घेण्यासाठी एक महिना तेथे यावे,' असे आवाहन वळवी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान वळवी यांच्या सहकाऱ्यांनी ढोलावर ताल धरत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले आणि उपस्थितांचे लक्षे वेधले.
कुलकर्णी म्हणाले, 'आदिवासी संस्कृतीत आजच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. या संस्कृतीतील नवतेचा शोध घेण्याची गरज आहे. आदिवासी भागातील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. ऑलिम्पिकमधील विश्वविक्रम यांच्यापुढे काहीच नाहीत. त्यांना फक्त योग्य संधी मिळायला हवी. मुख्य प्रवाहातील शिक्षण आदिवासी भागातही मिळणे आवश्यक आहे.' श्वेता रानडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शास्त्री यांनी आभार मानले.