म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार यांची कायम वर्दळ असणाऱ्या नामदार गोखले रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर रविवारी शांतता अनुभवायला मिळाली. जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यान परिसरातील नीरव शांततेमुळे पक्ष्यांची किलबिल सहज कानी पडत होती. या दोन्ही रस्त्यांवरचे स्मार्ट पदपथ, बाकडी ओस पडली होती. एरवी दिवसभरात लाखो वाहने धावणाऱ्या या रस्त्यांवर क्वचितच एखादे वाहन पाहायला मिळत होते.
ना. गोखले रस्त्यावरील गोखले चौकात कायम वर्दळ असते. गुडलक हॉटेल, सागर ऑर्केड, सहकार मुद्रणालयाशेजारील गल्ली, रूपाली-वैशाली हॉटेल परिसर, फर्ग्युसन कॉलेज, ज्ञानेश्वर-तुकाराम पादुका चौक परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 'जनता कर्फ्यू' पाळला. त्यामुळे एरवी या परिसरात मोठ्या संख्येने दिसणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, टपऱ्यांपासून कॅफेपर्यंत गप्पांचा अड्डा जमवणारे युवक-युवती, नोकरदार; तसेच अन्य नागरिक अजिबात या रस्त्यावर फिरकले नाहीत. या रस्त्यावरील सर्व हॉटेल, दुकाने; तसेच अन्य सर्व व्यवसाय बंद होते. त्याचबरोबर गोखले रस्ता व जंगली महाराज रस्त्याला जोडणारे रस्तेही निर्मनुष्य झाले होते. आपटे रस्त्यावरही सामसूम होती.
एरवी शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या जंगली महाराज रस्त्यावरही रविवारी शुकशुकाट होता. अधूनमधून जाणाऱ्या व जवळपास रिकाम्याच धावणाऱ्या पीएमपी बस, अर्ध्या-पाउण तासाने जाणारे एखादे चारचाकी वाहन आणि मध्येच जाणारे एखादे दुचाकी वाहन या रस्त्यावर दिसत होते. संभाजी उद्यानाचा परिसर, त्याबाहेरील स्मार्ट पदपथ, त्यावर बसण्यासाठी केलेली खास व्यवस्था सर्व काही ओस पडले होते. बऱ्यापैकी दाट झाडी असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर पक्ष्यांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येत होता. रस्त्यावरील सर्व व्यवसाय पूर्णत: बंद होते. सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती.