म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला तरी अकरावीचे प्रवेश मात्र, सुरूच आहेत. दर वर्षी अकरावी प्रवेशप्रक्रिया उशिरानेच संपत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे या प्रक्रियेत काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रियेला उशीर होत असल्याने केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीवरही टीका होत आहे. ही टीका टाळण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत एटीकेटीचे विद्यार्थी, अर्ज करण्याची प्रक्रिया, पहिली फेरी यामध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडे आवश्यक शिफारसी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.
'सध्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दहावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाते. त्यानंतर त्याचा निकाल जाहीर होतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीला प्रवेश दिला जातो. मात्र, तोपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया लांबते. त्याऐवजी दहावीच्या मुख्य परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेनंतर संधी देण्याऐवजी त्याच वेळी अकरावी प्रवेशाची संधी देता येईल का, याची चाचपणी करता येईल,' असे राऊत यांनी सांगितले.
'विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन दहावीचा निकाल येईपर्यंत भरण्याची संधी देण्याचा विचार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पहिली फेरी घेण्याचाही प्रस्ताव आहे. यासह अन्य काही सुधारणाही सुचवण्यात आल्या आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
-------
'व्यापक बदल आवश्यक'
अकरावी प्रवेशप्रक्रियेत व्यापक बदल आवश्यक आहेत. त्याविषयीचा अहवाल 'सिस्कॉम'ने राज्याच्या शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागाकडे दिला आहे. अकरावी प्रवेशप्रक्रिया पारदर्शकपणे व वेळेतच पूर्ण होणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारताना पहिल्यांदा अर्जाचा पहिला भाग, त्यानंतर कोटा-आरक्षणाचा अर्ज व त्यानंतर नियमित प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरून घ्यावा. त्याचबरोबर गत वर्षीच्या कट-ऑफ गुणांच्या दहा टक्के कमी किंवा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचाच पसंतीक्रम स्वीकारला जाईल,अशी तरतूद केल्यासही ही प्रक्रिया गतिमान होऊ शकेल, असे 'सिस्कॉम'च्या संचालक वैशाली बाफना यांनी सांगितले.