म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्पे, वेगवेगळ्या नात्यांमधील वीण उलगडणाऱ्या ओव्या, गवळणी, काही ठसकेबाज तर काही लडिवाळपणे प्रेम व्यक्त करणारे उखाणे, मोजक्या शब्दांत जगणं शिकवणाऱ्या म्हणी, कोडी, लोककथा... गप्पा-गाण्यांमधून उलगडत गेल्या अन् लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांनी रसिकांना दिलेला लोकसाहित्याचा गावरान गोडवा श्रोत्यांनी अनुभवला.
'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'कलासंगम' या साहित्य आणि कलेच्या मेळ्याची दुसऱ्या दिवसाची सांगता 'रानजाई' या कार्यक्रमाने झाली. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. सरोजिनी बाबर म्हणजेच 'लाडक्या अक्का' यांच्या साहित्याचे विविध पैलू यानिमित्ताने दिसून आले. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि सविता कबनूरकर यांनी कार्यक्रम सादर केला. आदित्य आपटे यांनी विविध वाद्यांची साथसंगत केली.
महाराष्ट्रातील लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या संकलक आणि अभ्यासक म्हणून मोठा नावलौकिक मिळविलेल्या अक्का यांचे बालपण, पुढे लोकसाहित्याबद्दल निर्माण झालेलं आकर्षण, त्याचा राजकारणातील प्रवेश इथपासून ते त्यांची साहित्यनिर्मिती असा प्रवास या वेळी ओघवत्या गप्पा आणि गाण्यांमधून श्रोत्यांसमोर मांडला गेला. या कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि सरोजिनी बाबर यांनी पूर्वी दूरदर्शनवर सादर केलेल्या 'रानजाई' या लोकप्रिय गप्पांच्या मैफलीची आठवण उपस्थितांना झाली.
गौरी देशपांडे आणि वंदना बोकील यांनी बाबर यांचे साहित्यसंदर्भ दिले; तर अनुराधा जोशी यांनी 'अक्कां'च्या शैलीमध्ये गावाकडच्या प्रचलित म्हणी, उखाणे सादर केले. गावात राहणाऱ्या महिला, त्याचे आयुष्यातील विविध टप्पे किती सहज, साधेपणाने आनंदाने जगतात. या महिलांचे भावविश्व नेमकेपणाने टिपणाऱ्या आणि स्त्रीधन या पुस्तकातून ते लोकांपर्यंत ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या अक्का यांचे विविध किस्से देशपांडे आणि बोकील यांनी सांगितले.
सविता कबनूरकर यांच्या गायनाने गप्पांच्या मैफलीत सुरेल रंग भरले. लोककलेच्या ढंगाने गवळण, पाळणा, भोंडल्यातील हादगा सादर करून कबनूरकर यांनी उपस्थितांची दाद मिळविली. त्यांनी गायलेल्या 'राधे तुझा रंग पाणी कृष्णा तरी झाला दंग' या गवळणीला लोकांची 'वन्समोअर'ची फर्माईश केली. 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहसंपादक अभिजित थिटे यांनी सूत्रसंचालन केले. सहसंपादक सिद्धार्थ केळकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.
०००००