राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, जालना
मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायर्व्हसीटी पार्कची चळवळ सरकार राबवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाडा व विदर्भातील वनस्पतीच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असून मृद व जलसंधारण करावयाचे असल्यास तेथील स्थानिक प्रजातीचे शासकीय जमिनीवर जिल्हानिहाय बायोडायर्व्हसीटी पार्क निर्माण करून जतन करावे, असे नमुद केले. यावेळी त्यांच्यासोबत इश्वेद बायटेकचे संजय वायाळ व आमदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा उपस्थित होते.
खोतकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा सुरू केला असून त्यांच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे खोतकर यांनी सांगितले. मराठवाड्यात विशेषत जालन्यामध्ये वनाचे अत्यल्प प्रमाण पाहता खोतकर यांनी जिल्ह्यातील सर्व अधिका-यांची बैठक घेऊन वृक्ष लागवड ही व्यापक चळवळ करण्यासाठी पुढाकार घेतला.