म. टा. प्रतिनिधी, पुणे
'दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी असल्याने मराठे अब्दालीच्या बंदोबस्तासाठी उत्तरेत गेले. दक्षिण, उत्तर आणि राजस्थानातील राजे मराठ्यांच्या मदतीला आले नाहीत, तरीही पानिपतला मराठी सैन्याने शौर्याची पराकाष्ठा केली. पानिपत हा मराठी सैन्याच्या अजोड शौर्य, जिद्द आणि समर्पणाचा आविष्कार आहे,' असे सांगून भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पानिपतच्या संग्रामावर प्रकाश टाकला.
'पानिपतची शौर्यगाथा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 'शिव छत्रपती आणि पानिपत हे दोन्ही कालखंड मराठी माणसाच्या मनात रुजलेले कालखंड आहेत. बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी साम्राज्य अटकेपार गेले. लाहोर, अटक, सिंधू नदी आणि पूर्वेकडे दिनापूर, बंगाल, कटकपर्यंत मराठी फौजांचा संचार झाला. दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. परकीय आक्रमण असलेल्या अब्दालीला भारतात टिकू न देणे हे मराठी सैन्याने परम कर्तव्य मानले. पराक्रमाची शर्थ करून जिंकत आणलेले युद्ध मराठे हरले. शूरपणे लढणारा कोवळा विश्वासराव, 'बचेंगे तो औरभी लढेंगे' म्हणणारे दत्ताजी, बळवंतराव मेहेंदळे यांचा पराक्रम, विश्वासराव भाऊ यांच्याशी एकनिष्ठ राहणारा इब्राहीम खान गारदी, विश्वासराव जखमी झाल्यावर हताश होणारे सदाशिवरावभाऊ अशा असामींमुळे पानिपतचे युद्ध अजरामर ठरले, असे डॉ. भालेराव यांनी सांगितले.