म. टा. प्रतिनिधी, पुणे
गोष्ट म्हटले की लहान मुलांसाठी पर्वणी असते. एखादी रंजक गोष्ट ऐकताना जी उत्सुकता तयार होते. तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही. अशीच काहीशी उत्सुकता पुणेकर रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. चिमुकल्या मुलांनी गोष्टींचे अभिवाचन करून रसिकांना गोष्टींची सफर घडवली.
निमित्त होते, सुश्री फाउंडेशन, वंचित विकास व नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 'गोष्टींचा गाव' या विशेष कार्यक्रमाचे. वीस वर्षांपूर्वी जादूच्या गोष्टीची निर्मिती करून लहान मुलांचे विश्व निर्माण करणाऱ्या प्रकाश पारखी यांनीही विविध आठवणी सांगून कार्यक्रमाला रंगत आणली. आजकालची लहान मुले मैदानी खेळ खेळताना, गोष्टीची पुस्तके वाचताना दिसत नाहीत. मोबाइलच्या दुनियेत गोष्टी ऐकल्या जातात. मात्र, त्यांचे वाचन होत नाही. गोष्टीची पुस्तके वाचण्याची मजा ते आज गमावून बसलेली दिसत आहेत, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांनी अनेक कथांचे वाचन केले. प्रकाश पारखी यांनी 'जादूचे घर' दाखवून लहान मुलांना आनंद दिला. वंचित विकास संस्थेच्या अभिरुची गटातील मधुमिता सोनवणे, उमेश लोहार, आयेशा शेख, प्राजक्ता क्षीरसागर, प्रणिता गाडे यांनी 'निर्मळ रानवारा' या मासिकातील काही कथांचे अभिवाचन केले. 'नाट्यसंस्कार'च्या वेदांत गोळवलकर, आयुष परांजपे, अवनी ताम्हाणे यांनी 'खारीच्या वाटा' या कथेच्या संपादित अंशाचे अभिवाचन केले. श्रीजय देशपांडेंनी नाट्यछटा सादर केल्या. याप्रसंगी 'निर्मळ रानवारा' या बालमासिकाच्या 'नाट्यछटा' विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाला 'वंचित विकास'चे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी 'खारीच्या वाटा'चे लेखक ल. म. कडू, 'निर्मळ रानवारा'चे व्यवस्थापक स्नेहल मसालिया, सल्लागार ज्योती जोशी, सरोज टोळे, ललितगौरी डांगे, सुप्रिया जोगदेव आदी उपस्थित होते. श्रीराम ओक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला होता.
--------------------