म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सिनेमा आपली सांस्कृतिक गरज कधीच झाली नाही. आता तर मॉल संस्कृतीचा भाग म्हणून आपण सिनेमा पाहू लागलो आहोत. आपण चित्रपटाकडे कला म्हणून पाहत नाही. समाजात कलेची समज कमी आहे. निर्मात्यांचीही कलेची समज वरवरची आहे. एकत्र बसून सामूहिकतेने कलेचा आस्वाद घेण्याची सुसंस्कृतता आपल्याकडे नाही. आपण जागतिक तापमानवाढीबद्दल बोलतो, पाणी संपेल अशी चर्चा करतो. तशीच चर्चा कलेच्या बाबतीत झाली पाहिजे. कलेबाबत तातडीची जाण निर्माण झाली पाहिजे,' असे विचार अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी रविवारी मांडले.
'सिने इंडिया' आणि 'विकास इंडिया ट्रस्ट' यांच्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'चित्रपट माध्यमासमोरची आव्हाने आणि संधी' या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. चित्रपट संकलक (एडिटर) सुचित्रा साठे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, अभिनेत्री सई देवधर, चित्रपट अभ्यासक अमोल परचुरे सहभागी झाले होते. राज काझी यांनी संवाद साधला. महोत्सवाचे संयोजक विकास पाटील यांनी स्वागत केले.
'अभिव्यक्त होऊ शकतात त्यांनी सातत्याने नवं बोललं पाहिजे. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ वीस-तीस तरुणांना शिकण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट सारखे योग्य व्यासपीठ आहे. गल्ली बोळात फिल्म स्कूल सुरू झाले आहेत; पण तरुण चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित झाले तर चांगला आशय पुढे येईल,' याकडे गिरीश यांनी लक्ष वेधले.
सुचित्रा म्हणाली, 'मराठी चित्रपटाचे दीड कोटीचे बजेट सैराटमुळे सहा कोटी झाले. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगल्भ होत आहोत; पण आशयाची आणि कुशल लोकांची आवश्यकता आहे.'
'नग्नता, हिंसा यापेक्षा दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. नको तिथे वापर होतोय हे खरे आहे; पण भारतात ही माध्यमे योग्य वेळी दाखल झाली आहेत,' असे सईने सांगितले.
'मराठी सिनेमाचे बजेट पुन्हा दीड कोटीवर आले आहे. सहा महिन्यांत एकही दर्जेदार किंवा तिकीट खिडकीवर गर्दी खेचणारा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही,' यावर अमोलने बोट ठेवले.
--------------
'कल्पनाशक्तीला पश्चिमेची मगरमिठी'
'इथल्या मातीतला आशय निर्माण होणे अवघड झाले आहे. लेखकांच्या कल्पनाशक्तीला पश्चिमेची मगरमिठी पडली आहे. या चवचाल सांस्कृतिक अवस्थेपर्यंत आपण का आलो आहोत? मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या शरीरसंबंध आणि हिंसेचा वापर साहित्यात, सिनेमात याआधीही होता. प्रश्न हा आहे की, हा आशय विवेकाने वापरण्याची अक्कल आहे का? चांगले आस्वादक नसतील, तर आशय चांगला नसेल. समाजाने विकसित होत सेन्सॉरशिपमुक्त अवस्थेकडे जायला हवे,' असे विवेचन गिरीश यांनी केले.
---------
तिन्ही खानचे सिनेमे पडतात आणि आयुषमान हिरो होतो. याचा अर्थ प्रेक्षक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन काय हवं नको ते ठरवू लागले आहेत. जगात प्रदर्शित झालेला सिनेमा किंवा वेबसीरिज खेड्यात पोहोचत आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे कप्पे आता नाहीत. आपल्या निर्मितीची मोठ्या पटलावर चर्चा कशी होणार, हा प्रश्न असल्याने 'प्रमोशन ट्रिक' म्हणून शरीरसंबंध, शिव्या याचा वापर होताना दिसतो.
- आदित्य सरपोतदार
--------------