म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने येत्या ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान सेंद्रीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील कृषिभवन आवारात तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून यामध्ये शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री केली जाणार आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नागरिकांना चांगल्या दर्जाचे सेंद्रिय धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना इंद्रायणी, आंबेमोहर, कोलम, फुले असा तांदूळ तसेच गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, फळे, भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना विक्री होणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य, भाजीपाला मिळावा यासाठी राज्य सरकारच्या आत्मा योजनेच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
.
सेंद्रिय शेतीसाठी 'आत्मा'चे प्रोत्साहन
'आत्मा'तर्फे ५० एकर शेतजमिनीचा एक गट असे ४० गटांची स्थापना करण्यात आली. यामध्ये १,८९२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, सुमारे दोन हजार एकर क्षेत्रांवर सेंद्रीय शेती केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात २२ नवीन गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये ७०३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. १,१०० एकर क्षेत्रावर ही शेती करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मुदतवाढीचा विचार केला जाणार आहे.
.
सेंद्रिय धान्य महोत्सवामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणारा शेतमाल शंभर टक्के सेंद्रिय आहे. त्याची तपासणी सरकारमान्य प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. तपासणीनंतरच हा सर्व शेतमाल महोत्सवात ठेवण्यात आला आहे.
- राजेंद्र साबळे, संचालक, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
.
सेंद्रिय धान्य महोत्सव
केव्हा : ६ ते ८ फेब्रुवारी
कोठे : कृषी भवन आवार, शिवाजीनगर
महोत्सवासाठी महत्त्वाचे : सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेला सर्वप्रकारचा शेतमाल